कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !
schedule08 May 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील २४७६ शाळापैकी ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी, आठ मे २०२६ रोजी दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला.
कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के इतका आहे. संपूर्ण राज्याच्या निकालाच्या टक्केवारीत कोल्हापूर विभाग द्वितीयस्थानी आहे. कोल्हापूर विभागाने गेल्या दहा वर्षात २०२१ चा अपवाद वगळता निकालात दुसरेस्थान कायम राखले आहे. शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी निकालाची माहिती दिली. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाइनद्वारे सहभागी होत कोल्हापूर विभागाच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली.
कोल्हापूर जिल्हयाचा निकाल ९६.६७ टक्के, सांगली जिल्हयाचा निकाल ९३.५६ टक्के तर सातारा जिल्हयाच्या निकालाची टक्केवारी ९५.१७ टक्के इतकी आहे. राज्याचा निकाल ९२.०६ टक्के इतका आहे. राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल ३.३८ टक्के जास्त आहे. यंदा परीक्षेदरम्यान सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य केली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षाच्या निकालात १.४० टक्केने घट झाली आहे. दरम्यान कोल्हापूर विभागातील शंभर टक्के निकाल प्राप्त शाळांच्या यादीवर नजर टाकली तर कोल्हापूर जिल्ह्यातील ४१५ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. सातारा जिल्हयातील २०२ शाळा तर सातारा जिल्हयातील ३११ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे.
कोकण विभाग यंदाही ९७.६२ टक्के प्राप्त करत राज्यात अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे दहावी परीक्षेत, राज्यभरातील १७९ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील १५ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभाग अग्रस्थानी आहे. लातूर विभागातील १०४ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण आहेत.संभाजीनगर विभागातील २४ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत.
कोल्हापूर विभागीय निकालावर दृष्टीक्षेप
कोल्हापूर विभागातंर्गत यंदा दहावीच्या परीक्षेत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील २४७६ माध्यमिक शाळेमधून ३६२ परीक्षा केंद्रावर एकूण एक लाख २९ हजार ४९९ इतक्या नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख २३ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.३६ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८६ टक्के इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५० टक्के जादा आहे. दहावी परीक्षेस कोल्हापूर जिल्ह्यातील ९९५ शाळांमधून ५४,२१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२,३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्यातील ७८० माध्यमिक शाळेतून ३६,५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४,८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यातील ७०१ शाळांमधून ३८,७७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,०१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातंर्गत ४३०९ विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने स्वीकारुन गुणदान केले. मार्च २०२६ मधील परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी सातारा जिल्ह्यातील एक, सांगली जिल्ह्यातील दोन व कोल्हापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थी असे एकूण चार जणांची गैरमार्ग केलेल्या विषयाची संपादणूक रद्द केली आहे. पत्रकार परिषदेला मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सहसचिव गजानन उकिर्डे, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दिपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते.