महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
पाच वर्षात कोल्हापूरचे खासदार ग्रामीण भागात फिरकले नाहीत. जनतेला न भेटणारे, कामे न करणारे आणि सतत नॉट रिचेबल असणार्या खासदारांना निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार्या खासदारांनी जनतेच्या विकासासाठी सत्ताधार्यांकडे गेलो असे म्हणताना कोणता प्रकल्प मतदारसंघासाठी आणला याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करतानाच केवळ स्वार्थासाठी तुम्ही विश्वासघात केला, असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी लगावला.
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे, पनोरी, सरवडे यासह विविध ठिकाणी झालेल्या शाहू महाराजांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
गोकुळचे संचालक आर. के. मोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी खोटी आश्वासने आणि भूलथापा मारण्यात पटाईत आहेत. मतदारांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहूंच्या कृपेमुळे राधानगरीची जनता सधन झाली आहे. आपल्या अंगावर असणारी कपडेलत्ते आणि गाड्या-माड्या या केवळ शाहू राजांच्या दूरदृष्टीमुळे प्राप्त झाल्या आहेत. छत्रपती घराण्याच्या या उपकारांची जाणीव ठेवून श्रीमंत शाहू छत्रपतींना मोठा विजयोत्सव साजरा करीत दिल्लीला पाठवूया.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे उपकार जाणू या आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना निवडून देऊ या.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले म्हणाले, या निवडणुकीत शिवसैनिकांनी गद्दारांना गाडण्याचा निर्धार केला आहे.
याप्रसंगी जनता दलाचे नेते अॅड. शिवराज खोराटे, शरद पाडळकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी आदींची भाषणे झाली.
रणधीर मोरे यांनी स्वागत व अतुल कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रचार सभेसाठी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे, पांडुरंग भांदिगरे, सुशील पाटील- कौलवकर, शिवाजी आदमापुरे, जयवंत पाडळकर, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, भगवान पादले के. डी. चौगुले, बिद्री संचालक डी. एस. पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबा पाटील, शंकर फराकटे, दत्ता पाटील, हेमंत कोतमीरे, अशोक बारड, राजेंद्र मगदूम, अनंत सावंत, सुमन मोरे, बाबासाहेब पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते. टी. ए. मगदूम यांनी आभार मानले.
..........
राधानगरी तालुक्यात पहिले संपर्क कार्यालय
राधानगरी तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित करू तसेच जनतेशी संपर्क साधण्यासाठी सुरू करण्यात येणारे संपर्क कार्यालय राधानगरी तालुक्यातील पहिले असेल, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दिली. राधानगरीशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करायला आपण प्राधान्यक्रम देऊ असेही ते म्हणाले.