महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. हे माझं मोठं भाग्य आहे, की त्यांनी मला ही मोठी संधी दिली. पण नुकताच मी त्यांना फोनवरून मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. त्यांना माझी भूमिका मी नम्रपणे सांगितलेली आहे. असे डॉ.चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या तीन पिढ्या नरके घराणे समाजाच्या कल्याणासाठी झटत आहे. आणि गेली अडीच वर्षे मी कोल्हापूर लोकसभेसाठी चांगल्या पद्धतीने काम करत असताना १२५५ गावापर्यंत गाव ते गाव संपर्क ठेवलेला आहे. कामाचा आवाका, माझे शिक्षण, गगनबावडा, पन्हाळा, करवीरमधील माझ्या मतांचा गठ्ठा, गोकुळच्या माध्यमातून नरके गटाचे काम बघून लोकसभेसाठी माझा विचार झाला होता. पण हातकणंगले लोकसभा उमेदवारीस मी नकार दिला आहे. कारण इतक्या कमी दिवसात प्रत्येक गावात मी पोहोचू शकत नाही. अडीच ते तीन लाखांचे माझे मतदान असल्याने त्यांनी मला तिकीट दिले होते. परंतु वेळ कमी असल्याने मी ते नाकारले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांना विचारले असता, मी लवकरच निर्णय घेईन. तिसरा पर्याय मी होऊ शकतो. जनता हाच मोठा पक्ष आहे.मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणातून मी माघार घेतलेली नाही. मी रिंगणात असणार आहे. पण कशा पद्धतीने असणार आहे, हे लवकरच सांगेन. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे. अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. असे सूचक वक्तव्य देखील नरके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.