शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !
schedule18 Jul 26 person by visibility 50 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्रस्तावित नागपूर-गोवा 'शक्तिपीठ महामार्गा'विरोधात शेतकरी आणि वारकऱ्यांनी एकत्र येत 'शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पंढरपुरात 'सद्बुद्धी दिंडी’ काढण्यात आली. भर पावसातही हजारो आंदोलकांनी या दिंडीत सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध केला. प्रकल्प रद्द न केल्यास सरकारचा 'शक्तिपात' (पराभव) करण्याचा थेट इशारा दिला. संतराज पॅलेस ते विठ्ठल मंदिर अशा काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत राज्यातील बाधित १३ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी व वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हा महामार्ग पूर्णपणे कागदावरून आणि जमिनीवरून रद्द होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा एकमुखी निर्धार सर्व नेत्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहीते- पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील, अभिजीत पाटील आदींचा सहभाग होता. तत्पूर्वी शेतकऱ्यांचा मेळावा इसबावी (पंढरपूर) येथे पार पडला. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘ मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी २५ हजार एकर जमीनी संपादित करून २० हजार एकर बागायत जमीनी शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्याची दुर्बुध्दी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुचली आहे त्याबरोबरच या प्रकल्पातून फडणवीस यांना जवळपास ५० ते ६० हजार कोटींचा ढपला पाडायचा आहे. यामुळे पांडुरंगाने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी मुख्यमंत्र्यांना द्यावी.’ आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. "जनतेचा तीव्र विरोध डावलून केवळ कंत्राटदारांच्या आर्थिक फायद्यासाठी हा महामार्ग लादला जात आहे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावण्याचा प्रयत्न केला, तर आगामी काळात या सरकारचा 'शक्तिपात' केल्याशिवाय जनता राहणार नाही," असा थेट इशारा त्यांनी दिला.
आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले "महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, शेतीचे पाणंद रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करायला सरकारकडे पैसे नाहीत; मग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा न मागितलेला महामार्ग कोणासाठी?" असा सवाल उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत शेतकरी बांधवांसोबत ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली. आंदोलनात शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, राजन क्षीरसागर, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, बी.जी पाटील, कॉ. धनाजी गुरव, के. के. पाटील, वसंत देशमुख, अजित पवार, राजेंद्र गड्ड्यानवार, तानाजी बागल, पल्लवी पाटील, विनंती कुलकर्णी, गजेंद्र येळकर, सचिन जगताप, संदीप पाटील, ऋषिकेश देशमुख, नागेश फरे आदी होते.