प्रचार सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, विविध संघटना, संस्थांनी जाहीर केला पाठिंबा
कोल्हापूर : ‘‘छत्रपती कुटुंबीय आणि राधानगरी परिसर यांच्यामध्ये एक वेगळे नातं आहे. शाहू छत्रपतींची उमेदवारी ही रयतेने आपली उमेदवारी मानली आहे. राधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून शाहू छत्रपतींच्या विजयासाठी एकवटले आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. राधानगरी तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल.’असा विश्वास गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ फेजिवडे (राधानगरी) येथे जाहीर सभा आयोजित केली होती. उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेला विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विविध संघटनांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने शाहू छत्रपतींची भेट घेत पाठिंबा दिला.
गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे म्हणाले, ‘राधानगरी परिसराच्या विकासासाठी छत्रपती कुटुंबीय नेहमी प्रयत्नशील आहेत. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेपासून पर्यटन वृद्ध्रीपर्यंत सहकार्य आहे. शाहू छत्रपतींची उमेदवारी जनतेने आपली मानली आहे. याचे प्रत्यंतर संपूर्ण तालुक्यात प्रचार दौऱ्यात आले. गावेच्या गावे त्यांच्या पाठीशी आहेत. पाठिंबा देत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या विजयासाठी काम करत आहेत.’
राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे. देश संकटात असल्यासारखाी स्थिती आहे. या स्थितीत समाजहिताला प्राधान्य देत शाहू छत्रपती मैदानात उतरले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारखाना निवडणूक हे सारे बाजूला ठेवून साऱ्यांनी शाहू छत्रपतींना मतदान करण्याचे ठरविले आहे. हात या चिन्हावर बटण दाबून राधानगरी तालुक्यातील ८० टक्के मतदान त्यांच्या बाजूने करु या’
याप्रसंगी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांची भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचे नेते कृष्णराव किरुळकर, पी. डी. धुंदरे, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, सुधाकर साळोखे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, सरपंच प्रतिभा कासार, माजी सरपंच फारुक नावळेकर, उत्तम पाटील, दादासो सांगावकर आदी उपस्थित होते.
.....................
भाजपा सरकार सत्तेवर आले तर निवडणुकाच होणार नाहीत
जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीचा आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. त्यांची ४०० पारची घोषणा ही संविधान बदलण्यासाठी आहे हे भाजपवालेच सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप जिंकली तर कोणत्याच निवडणुका होणार नाहीत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. सगळया समाजाला सोबत घेऊन विकासात्मक वाटचाल करायची हे धोरण शाहू छत्रपतींचे आहे.’