जुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
schedule22 Aug 26 person by visibility 53 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एक नोव्हेंबर 2000 पूर्वी विनाअनुदानित, अंशता अनुदानित, कायम आस्थापनेवरील नियमित वेतनश्रेणीतील राज्यभरातील 26000 शिक्षकांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी 5 सप्टेंबर 2026 रोजी कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरातून आंदोलनाचा एल्गार पुकारला असून सरकारने या मागण्यांची सकारात्मक दखल घेतली नाही तर 28 सप्टेंबर 2026 पासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून शनिवारी 22 ऑगस्ट रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे जुनी पेन्शन निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना सर्वच शिक्षक नेत्यांनी जुनी पेन्शनसाठी आता आरपारची लढाई असून मागण्या मान्य होईपर्यंत माघारी हटायचे नाही असा निर्धार केला. ' एकच मिशन - जुनी पेन्शन, एकच निर्धार जुनी पेन्शन' अशा घोषणा देत आवाज आणखी बुलंद केला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, 'शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी संघटना मजबूत असायला हवी. संघटना एकसंध राहिली तर सरकार दरबारी आवाज आणखी बुलंद होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यतत्पर आहेत त्यांच्यापुढे एखाद्या विषयाची फाईल नेली तर विषय मार्गी लागतात. त्यामुळे साऱ्यांनी मिळून 26000 शिक्षकांना न्याय मिळवून देऊ या. दिवाळीपर्यंत सरकार याविषयी घोषणा करून शिक्षकांची दिवाळी गोड करेल' असा आशावाद गावडे यांनी व्यक्त केला. राज्यभरातील 26000 शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करू. मंत्रालयाला कुलूप ठोका आंदोलन पुकारू असा इशाराही त्यांनी व्यासपीठावरून दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने,' शिक्षकाने ठरवलं तर व्यवस्था कोलमडून पडू शकते याचे भान साऱ्यांना हवे. शिक्षकांना प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागते. शिक्षकांच्या मागण्यासाठी आपण कायम सोबत आहोत .जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. शिक्षकदिनाच्या अगोदरच शिक्षकांना चांगली बातमी मिळू शकेल. ' मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी व प्राचार्य दत्तात्रय घुगरे म्हणाले, 'जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घेतल्याशिवाय आता लढाई थांबणार नाही. गेली 18 वर्षे जुन्या पेन्शनसाठी लढा सुरू आहे. किती संयम राखायचा, किती दिवस वाट पाहायचा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील म्हणाले, जुनी पेन्शनसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून अडथळा आणला जात आहे . आमची लढाई जुनी पेन्शनसाठी आहे कोणा विरोधात नाही. शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले,' जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांच्या हिताची आहे. या प्रश्नी जे आम्हाला साथ देतील त्यांनाच आम्ही येत्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊ. प्रसंगी पदरमोड करू आणि त्यांचा प्रचार करू. शिक्षक वर्गासाठी जुनी पेन्शन हा विषय महत्त्वाचा आहे. ' महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी आंदोलन करताना घ्यायची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, सुरेश संकपाळ, जयसिंग पवार यांची ही भाषणे झाली. जुनी पेन्शनसाठी विविध टप्प्यावर आंदोलन करण्यात येणार आहेत. एक ते चार सप्टेंबर या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन करायचे आहे तर 5 सप्टेंबर रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता दसरा चौक येथून मोर्चाला प्रारंभ होईल या आंदोलनानंतर सरकारने योग्य दखल घेतली नाही तर 28 सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करण्याचे ठरले.
या मेळाव्याला माजी आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक नेते भरत रसाळे, बाबा पाटील, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर वाय पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, सुरेश जाधव, संजय पाटील विलास पोवार आदी उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.