कोल्हापूर महापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सुरुवात
schedule12 Jan 26 person by visibility 171 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून विद्युत निर्मिती हा कोल्हापूर महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि खर्च बचत या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
कोल्हापूर शहरातून दररोज सरासरी २८० ते ३०० टन कचरा संकलित होतो. यामधील सुमारे शंभर ते १२० टन ओला कचरा भाजी मंडई, हॉटेल वेस्ट तसेच घरगुती ओल्या कचऱ्यापासून वेगळा करून कसबा बावडा येथील झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणला जातो. या ठिकाणी महानगरपालिकेचे एकूण दोन बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. यापैकी तीस टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प २०१९ मध्ये उभारला. स्वच्छ भारत मिशन (टप्पा २) अंतर्गत आणखी वीस टीपीडी क्षमतेचा नवीन बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प २०२५ मध्ये सुरू झाला.
सात नोव्हेंबर २०२५ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पातून आता प्रत्यक्ष वीज निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात वीस टीपीडी प्रकल्पावरील कन्वेअर बेल्ट, इतर यंत्रसामग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातील पथदिव्यांना या वीज निर्मिती प्रकल्पातून विद्युत पुरवठा देण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील ३५ हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व मोटर्स या वीज निर्मिती प्रकल्पावर कार्यरत करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात केवळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या वीज खर्चात एका वर्षात सुमारे साठ ते ७० लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच आगामी काळात या दोन्ही बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर आधारित कॉम्प्रेस्ड सीएनजी प्रकल्प उभारणी प्रस्तावित आहे. यामुळे महानगरपालिकेला प्रतिवर्षी अंदाजे तीन ते चार कोटी रुपयांची बचत होणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प प्रशासक के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी या प्रकल्पाचे कामकाज दैनंदिन पाठपुरावा करून प्रभावीपणे पाहिला आहे.