गोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !
schedule05 Jun 25 person by visibility 1041 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर उफाळलेल्या गोकुळच्या राजकारणाला रोज नवीन उकळी फुटत आहे. आता यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक ही उतरले आहेत. त्यांनी, समविचारी नेत्यांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोकुळच्या कामकाजावरुन सत्ताधारी नेतृत्वावरही टीका केली. जिल्ह्यात अमूलकडून होत असलेल्या दूध संकलनावर बोलताना ‘आम्ही सत्तेत असताना अमूल्ने जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आम्ही काही त्यांचे चालू दिले नाही. आता रोज दीड लाख लिटर दूध संकलन अमूलकडून होते, हे अपशय कोणाचे ? असा सवालही केला आहे.
गोकुळच्या आगामी निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी उरला आहे. मात्र आतापासूनच गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटली आहे. गेले महिनाभर शह-काटशहाच्या राजकारणावरुन गोकुळ राज्यभर चर्चेत आहे. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदावरुन केलेले बंड, सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी उर्वरित संचालकांना एकत्र करत डोंगळेंना दिलेला शह, पुढे अध्यक्ष महायुतीचा की महाविकासचा ? यावरुन रंगलेली चर्चा, अध्यक्षपदाच्या निवडीत राज्य पातळीवरुन झालेला हस्तक्षेप, सत्ताधारी नेत्यांना अध्यक्षपदासाठी नावात करावा लागलेला बदल, खासदार धनंजय महाडिक यांनी आगामी निवडणूक महायुतीमार्फत लढविण्याची केलेली घोषणा यामुळे गोकुळध्ये राजकीय खेळ भलताच रंगतदार बनत आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी गोकुळमध्ये तीस वर्षे सत्ता गाजविली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना पायउतार व्हावे लागले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेजण सक्रिय होत आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही, यामध्ये उडी घेतली आहे. माजी आमदार महाडिक यांनी थेट निशाणा साधताना महाडिक यांनी ‘गेल्या चार वर्षात दूध संस्था व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. म्हैस व गाय दुधाला काही जण सर्वाधिक दर दिल्याचा डांगोरा पिटत आहेत. मात्र ही मंडळी शेतकऱ्यांना फार काळ फसवू शकत नाहीत.गेल्या निवडणुकीत वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. सत्ता द्या, वासाचे दूध परत करतो अशा वल्गना करणाऱ्यांनी, गेल्या चार वर्षात वासाचे दूध का परत केले नाही ? कायद्यानुसार वासाचे दूध परत करता येत नाही. मात्र त्या काळात दुग्ध व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री असलेल्यांनाही हा कायदा माहित नसावा यासारखे दुसरे दुर्दैव नाही. गेल्या चार वर्षात गोकुळमध्ये तब्बल दीड हजार दूध संस्था वाढल्या. पण दूध संकलन कुठे वाढले ? इतर जिल्ह्यातून दूध संकलन करतात आणि १८ लाख लिटर दूध संकलन केला अशा गप्पा मारतात.’असा टोलाही लगाविला.