महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील कुटुंबांना कापडी पिशवी वाटप करणे, प्लास्टीक ब्रिक्स तयार करणे आणि टाकाऊ वस्तूंपासुन टिकावू वस्तु तयार करणे असे विशेष उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे.
स्वच्छता ही सेवा मोहीम १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार स्वच्छतेचे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येत आहेत. या पंधरवड्यात पर्यावरणपूरक व विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कचरा साचलेली ठिकाणे निश्चित करुन श्रमदान करणे, सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करणे, लोकसहभाग आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामपंचायतीमार्फत एक लाख कापडी पिशवी वाटप करण्याचा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय, कापडी पिशवीच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत निधी, सीएसआर मधुन या कापडी पिशव्या घेण्यात येणार आहेत. या पिशवीवर स्वच्छता ही सेवा २०२४ चे बोधचिन्ह व ग्रामपंचायतीचे नाव प्रिंट करण्यात येणार आहे.