महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प करवीर निवासिनी अंबाबाई(महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने दप्तर अभियानांतर्गत 650 गरजू विद्यार्थ्यांना भरलेल्या दप्तरांची भेट देण्यात आली. यावर्षी प्रथमच करवीर तालुक्याच्या बाहेरील शाळांचा समावेश या अभियानात करण्यात आला.
समाजातील अनेक शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण पालकांच्या आर्थिक कमकुवत स्थितीमुळे अपुरे राहते. शालेय शिक्षणातच अनेकांची शाळा कायमची बंद होते. याचे एक प्रमुख कारण शैक्षणिक साहित्याची कमतरता असल्याचे काही निरीक्षणावरुन स्पष्ट झाले आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यास त्यांच्या शिक्षणात खंड पडत नाही. ही गोष्ट लक्षात घेवून श्रीपूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठान गेली 10 वर्षे गरजू विद्यार्थ्यांना पूर्ण भरलेले दप्तर देत आहेत.
इयत्तेनुसार 1 रेघी, 2 रेघी, 100 पानी, 200 पानी, आणि मोठ्या वह्या अशा 10 वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला पुस्तीका, रंगीत खडू, फुटपट्टी आणि चांगल्या प्रतीची सॅक या गोष्टींचा समावेश असतो.
यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शिवाजी विद्यालय उद्यमनगर, कोटितीर्थ विद्यामंदिर शाळा, महर्षि वि. रा.उर्फ आण्णासो शिंदे विद्यामंदिर, ज्ञशेठ रामनारायण रुईया विद्यालय शाळा, डॉ. बाळासाहेब खर्डेकर विद्यामंदिर शाळा, या शाळात आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, बुधवार पेठ, सांगरूळ हायस्कूल सांगरुळ, कै.सौ. वत्सलाबाई बापूसाहेब पाटील विद्यामंदिर टोप, कुमार विद्यामंदिर पाडळी खुर्द या शाळांमध्ये हे दप्तर वाटपाचे कार्यक्रम पार पडले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर आणि समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिनी दिवाण, दिपा ठाणेकर, धनश्री उदंगावकर, मिनल इनामदार, उमेश उदंगावकर, सारंग मुनिश्वर, मनोज मुनिश्वर, संतोष जोशी, राजू खाडे, अमित कांबळे, ऋतुराज नढाळे, ओंकार गोसावी, शुभंकर गोसावी यांनी परिश्रम केले.