चाळीस वर्षे सेवा..कॉलेजवरील गेटवरचा शेवटचा निरोप…शिपाई मामांनी मारली सचिवांना मिठी
schedule07 Jul 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन : गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेजमध्ये तब्बल चाळीस वर्षे नोकरी करुन शिपाई तुकाराम कांबळे हे ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेतर्फे सचिव अनिल कुराडे यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराचा समारंभ संपला. शिपाई कांबळे हे संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत कॉलेजमधून बाहेर पडले. तेव्हा सचिव कुराडे यांनी संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून २०० हून अधिक जणांना सोबत घेऊन शिपाई तुकाराम कांबळे यांना सोडायला कॉलेजच्या गेटपर्यंत आले. त्याठिकाणी कांबळे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सचिव कुराडे यांना मिठी मारली. तेव्हा उपस्थितांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. हा सारा प्रसंग संस्थेतील लॅब अॅटेंडंट पांडूरंग पाटील यांनी शब्दबद्ध केला. तो त्यांच्याच शब्दांत…
‘ कार्यक्रम संपला. सत्कार, भाषणं, फोटो... सगळं आटोपलं. तुकाराम कांबळे हे सर्वांचा निरोप घेऊन कॉलेजच्या गेटकडे निघाले. सर्वजण त्यांना मामा म्हणून हाक मारीत. ते, चाळीस वर्षे ज्या गेटमधून रोज आत आले, आज त्याच गेटमधून शेवटचं बाहेर पडायचं होतं. पावलं जड झाली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, "मामा, थांबा." संस्थेचे सचिव अनिल कुराडे हे स्वतः मामांना सोडवायला गेटपर्यंत आले होते. चाळीस वर्षांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी संस्था सचिव स्वतः गेटपर्यंत आले, हेच त्यांच्यासाठी खूप होतं. सचिव कुराडे यांना पाहताच मामांचा बांध फुटला. गेली चार दशकं, जी निष्ठा, जी माया, जी आपुलकी मिळाली... ती सगळी एका क्षणात डोळ्यांसमोर आली. त्यांनी भरल्या डोळ्यांनी संस्था सचिवांना घट्ट मिठी मारली. हमसून हमसून रडू लागले. शब्द उमटत नव्हते, फक्त हुंदके होते.
"साहेब... निघालो... 40 वर्षं सांभाळलंत... पोरासारखं जपलंत..." त्यावर सचिव कुराडे यांनी, काही न बोलता त्यांच्या पाठीवर मायेची थाप मारली. त्यांचेही डोळे पाणावले. चाळीस वर्षं 'सचिव' आणि 'कर्मचारी' हे नातं होतं, पण त्या गेटवर, त्या एका मिठीत ते नातं 'कुटुंब' झालं. ना व्यासपीठ, ना माईक, ना टाळ्या. *शिवराज कॉलेजच्या गेटवर फक्त दोन माणसं होती... एकाने प्रामाणिक सेवा दिली, आणि दुसऱ्याने त्या सेवेवर विश्वास ठेवला. ती मिठी सांगत होती - इथे नोकऱ्या लागत नाहीत, तर माणसं जोडली जातात. इथे पगार दिला जात नाही, तर माया दिली जाते. काही वेळांनी, सचिव कुराडे म्हणाले, "मामा, रडू नका. गेट उघडंच आहे तुमच्यासाठी. जेव्हा वाटेल तेव्हा या. ही तुमचीच संस्था आहे." यावेळी उपस्थितही गहिवरले. गेटवर मारलेली ती मिठी... ती फक्त निरोप नव्हती. ती होती चाळीस वर्षांच्या ऋणानुबंधाची शेवटची गाठ.काही निरोप शब्दांनी नाही, तर अशा मिठीनेच पूर्ण होतात.’
………………
‘तुकाराम कांबळे यांनी जवळपास ४२ वर्षे नोकरी केली. एका अर्थी त्यांनी सेवेचा रेकॉर्ड केला. ते संस्थेचे माजी विद्यार्थी. ज्या संस्थेत शिकले, तिथेच नोकरी केली. नोकरीच्या कालावधीत त्यांना कधीही कामाविषयी सांगावे लागले नाही. इमानेइतबारे सेवा पार पाडली. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या सदिच्छा समारंभानंतर माझ्याबरोबर संस्थेचे जवळपास २५० कर्मचारी गेटपर्यत आले. हे प्रसंग संस्था आणि कर्मचाऱ्यांतील स्नेहबंध जपणारे आहेत.’
- अनिल कुराडे, सचिव कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे शिवराज शैक्षणिक संकुल