राज्याच्या बजेटपूर्वी जीएसटीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु- आमदार अमल महाडिक
schedule04 Feb 25 person by visibility 190 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : व्यापारी-उद्योजकांवर आंदोलन करण्याची वेळ न येता त्यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू. कर्नाटक, गुजराsपेक्षा महाराष्ट्रातील वीजेचे दर कमी घेऊन उद्योजकांना न्याय देण्यात येईल असे स्पष्ट सांगत राज्याच्या बजेटपूर्वी जीएसटीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी वीज दरवाढीचा प्रश्न गेले १५ ते २० वर्षे झाले जटील होत चालला असून महाराष्ट्रात वीजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. त्यामुळे उद्योगांचा स्पर्धात्मक दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत घसरत चालला असल्याने महावितरणने प्रस्तावित केलेली वीजदरवाढ मागे घ्यावी असे सांगितले
चेंबरचे उपाध्यक्ष व स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी वीज दरवाढीने उद्योजकाचे कंबरडे आधीच मोडले असून महावितरणने २०२५ ते २०३० साठी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. कोल्हापूरातील उद्योग बाहेर जाण्याचे वीज दरवाढ हे मुख्य कारण आहे. प्रस्तावित वीज दरवाढीचा निर्णय रद्द करावा.
मानद सचिव अजित कोठारी यांनी महापालिकेने ज्यांची व्यवसाय परवाना फी ५०० रुपये आहे ती फी ३५०० रुपयापर्यंत वाढ केली हे अन्यायकारक असल्याचे नमूद केले. क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी भोगवटदार वर्ग २ वरुन वर्ग १ वर रुपांतरित करणेबाबत शासन अधिसूचनेस मुदतवाढ मिळावी असे सांगितले. कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे सेक्रेटरी सिध्दार्थ लाटकर यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सराफ व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा करताना व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. यावेळी संजीव परीख, शिवाजीराव पोवार, सुरेश इंग्रोळे, अरुण सावंत, सुभाष जाधव, संदीप वीर, अय्याज बागवान यांनी मनोगते व्यक्त केली.
आमदार महाडिक यांनी सर्व प्रश्न ऐकून घेतल्यानंतर वीजेचे दर नक्कीच कमी करु असे सांगितले. महापालिका व्यवसाय परवाना व अग्निशमन कराबाबत माहिती घेऊन प्रशासकांबरोबर लवकरच बैठक बोलावू. गोल्ड क्लस्टरचा प्रश्न जून पर्यंत सोडविण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. तार्थक्षेत्र आराखडा करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढू असे सांगितले. कागल चेक पोस्ट बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असे सांगितले.
यावेळी राहुल नष्टे, संचालक संपत पाटील, अनिल धडाम, प्रकाश पुणेकर, संभाजीराव पोवार, प्रकाश केसरकर, भाऊ घोगळे, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.जयेश ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. वैभव सावर्डेकर यांनी आभार मानले.