टिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!
schedule16 Jun 26 person by visibility 157 categoryजिल्हा परिषद
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जवळपास दोन तपाअगोदरची गोष्ट…ते सगळे एकाच पक्षाचे…बहुतांश जणांचा तो उमेदीचा काळ…कोण कार्यकर्ता तर कोण पदाधिकार…एका पक्षासाठी एका ध्येयासासाठी एकत्र चाललेली पावलं…पुढे वेगवेगळया वळणावर वळली. कोणी पक्ष बदलला…कोणाच्या विचारधारेत फरक पडला…त्यांच्या भूमिकाही बदलल्या…कार्यकर्त्यांचे आता आमदार, खासदार आणि मंत्री झाले... अनेकांच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थिती बदलली मात्र जवळपास पंचवीस वर्षापूर्वी जुळलेले स्नेह्याचे धागे आजही घटट..त्या मैत्रीच्या धाग्यांनी पुन्हा एकदा साऱ्यांना एकत्र आणले आणि आठवणींचा पटही उलगडला. साऱ्यांच्या डोक्यात घडयाळाची टिक टिक आजही कायम असल्याचे जाणवले.
निमित्त घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पूर्वाश्रमीचा कृतज्ञता स्नेह मेळाव्याचे. राष्ट्रवादीच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक अध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांच्या पुढाकारातून हा स्नेहमेळावा झाला. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजीत पाटील, रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या मंडळींनी उपस्थितांशी मनमोकळा संवादही साधला. बदलत्या राजकीय स्थितीवरुन एकमेकांचे चिमटे काढले. त्यावेळच्या पदाधिकारी निवडीमागील नाट्यही उलगडले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला आपल्या राजकी्य जीवनाचा पाया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातला. त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांना ओळख मिळाली अशा शब्दांत कृतज्ञतेचा भाव प्रकट केला.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘हा मेळावा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. राजकीय पक्ष, प्रोटोकॉल, झेंडे आणि सर्व बंधने बाजूला ठेवून, केवळ निखळ मैत्रीच्या नात्याने आणि जुन्या आठवणींच्या ओढीने आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. अनेक वर्षांनंतर सहकाऱ्यांना अगदी मनापासून भेटता आले, गप्पा मारता आल्या आणि भूतकाळातील सोनेरी क्षणांना उजाळा देता आला. हा केवळ एक मेळावा नव्हता, तर आमच्या मैत्रीच्या आणि प्रवासाच्या 'वेळे'चा अनोखा सन्मान होता!’
पालकममंत्री प्रकाश आबिटकर यांनी भाषणात राजकारणात, समाजकारणात साऱ्यांनी नेहमी पाय जमिनीवर ठेवून काम करायला हवे. साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचा कधी विसर पडू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. खासदार धैर्यशील माने यांनी, राजकारणात योग्य वेळ साधण्याची किमया ‘घडयाळ’ने शिकवली अशी कोटी केली. माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी ‘कृतज्ञता मेळाव्याची संकल्पना चांगली आहे. पण तो आयोजित करताना हंगाम मात्र चुकला. कारण सध्या गोकुळच्या निवडणुकीचे वातावरण आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आम्हा साऱ्यांना एकत्र बघून वेगळा संदेशही जाऊ शकतो.’असे म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. मेळाव्याचे स्वागताध्यक्ष रावसाहेब भिलवडे, अभिजीत तायशेटे, सुरेश पाटील, राजू जाधव, किरण घाडगे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी हिदायत मणेर, शाहू काटकर, दत्ता पाटील, बाबा नांदेकर, आप्पासाहेब धनवडे, शेखर मंडलिक, हंबीरराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.