काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणी
schedule16 Jun 26 person by visibility 92 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर, ता. १६ : पंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी शिंगणापूर पंपिंग स्टेशनकडे धाव घेतली. ‘प्रशासन व इरिगेशन विभागातील समन्वयाच्या अभावामुळे ‘धरण उशाला- कोरड घशाला’ अशी अवस्था शहरवासियांच्यावर ओढावली आहे अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी कामकाजाचे वाभाडे काढले.
दरम्यान महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज शिंगणापूर, नागदेवाडी व बालिंगा पंपिंग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप जल अभियंता जयेश जाधव, शाखा अभियंता मयुरी पटवेगार उपस्थित होते. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी तातडीने जलसंपदा विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त व जल अभियंता यांना सूचना दिल्या. त्यानुसार राधानगरी धरणातून १२३३ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, उद्या दुपारपर्यंत नदीची पाणीपातळी वाढून पंपिंग स्टेशनद्वारे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणीउपसा कमी प्रमाणात होत असल्याने महापालिकेने तातडीने भाड्याने टँकर उपलब्ध करून दिले असून, महापालिका तसेच खासगी टँकरच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मान्सून लांबल्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत होणारा पाणीउपसा बंद झाला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीउपसा सुरू करण्यात आला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५३३ कमी झाल्याने या पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा बंद झाला आहे. शहरातील अनेक भागांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथे भेट देऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक सुभाष बुचडे, संजय मोहिते, अमर समर्थ, प्रवीण सोनवणे, सचिन शेंडे, दुर्वास कदम, प्रशांत खेडकर, सागर येवलुजे, महेश उत्तुरे, संतोष जरग यांचा समावेश होता. सदस्यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे राबवून शहरातील सर्व भागांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.तर आयुक्त् भारुड यांनी, ‘तरी पावसाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरेसा राहावा यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून व काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करावे.’असे आवाहन केले.