जिल्हयात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान : संजयसिंह चव्हाण
schedule15 Sep 22 person by visibility 472 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.’ यावर्षी स्वच्छता ही सेवा अभियानात गावांची स्वच्छता ही संकल्पना घेउन हे अभियान होणार आहे.’अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत महाश्रमदानाव्दारे कचरा, विशेषत : प्लास्टीक कचरा संकलन व व्यवस्थापन करण्याचे नियोजित केले आहे. लोकसहभागाद्वारे ह मोहीम यशस्वी करावी. आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम होणार आहेत.
२६ सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत रेल्वे स्थानके, बाजारपेठा, शासकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर व मंदिर परिसर, समाज मंदिरे, शाळा, अंगणवाडी येथे स्वच्छता कार्यक्रम होतील. 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) घोषित करणे, ग्रामसभेमध्ये एकदाच वापरावयाचे प्लास्टीक बंदी बाबत ठराव असे उपक्रम होतील.
या अभियानात लोकप्रतिनिधी, गावातील सरपंच, सदस्य, गावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थांनी सहभागी होवून स्वच्छता ही सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.