महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कधी खेळाडूंना मदत कधी सेवाभावी संस्थांना सहकार्य करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील माणूसपणाचे दर्शन सोमवारी पुन्हा एकदा घडले. मंत्री पाटील यांनी कोल्हापूर येथील बाल संकुल केंद्रातून विवाह होऊन गेलेल्या महिलांना एकत्र आणत त्यांच्यासाठी दोन दिवसाची कोकण सहल आयोजित केली. तसेच सगळया महिलांना साडीचा अहेर दिला. या अनोख्या स्नेहबंधाच्या कार्यक्रमाने उपस्थित महिला भारावून गेल्या.
‘आपली बहिण माहेरी सुट्टीसाठी आल्यावर ज्यापद्धतीने एक भाऊ बहिणीचा मान सन्मान राखतो तसा आज मान सन्मान आम्हाला मिळाला” अशी भावना संबंधित महिलांनी व्यक्त केल्या.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेहमीच समाजातील वंचित, गरजू घटकांना सहाय्य केले आहे. अगदी आमदार असल्यापासून त्यांनी खेळाडू, कलाकार, विविध सामाजिक संस्थांना भक्कम ताकत दिली. त्याचधर्तीवर बाल संकुल केंद्रातून विवाह होऊन बाहेर गेलेल्या महिलांसाठी वेगळया उपक्रमाचे आयोजन केले. भावाच्या नात्यांने त्या साऱ्या महिलांना साडीचा अहेर दिला.
मिरजकर तिकटी या ठिकाणी सर्व महिला एकत्र आल्या आणि कोकण सहलीसाठी रवाना झाल्या. या सहलीसाठी मंत्री पाटील यांचे सहकार्य लाभले आहे . याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अग्रवाल, व्ही बी शेटे, स्वप्नील शेटे शुभांगी चौगले, शिरीष बोगार, वैशाली भोसले, अंजली वाघमारे, समीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते.