महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !
schedule11 Apr 26 person by visibility 54 categoryसामाजिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन :, अंधारात चाचपडणाऱ्या समाजासाठी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करत संबंध समाजमन ज्ञानानी प्रकाशमय करणाऱ्या…. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या.. सामाजिक गुलामगिरीविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे… शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध घेऊन पहिली शिवजयंती साजरी करणारे, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा ११ एप्रिल २०२६ रोजी द्विजन्मशताब्दी वर्ष. संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या उद्धारासाठी खर्ची घालणाऱ्या या महामानवाची द्विजन्मशताब्दी सरकारी पातळीवर मोठया थाटामाटात, शैक्षणिक उपक्रमांनी व समाजशील कार्यक्रमांनी साजरी व्हायला हवी होती. द्विजन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधून त्यांच्या विचार कार्याचा जागर घडविणाऱ्या कार्यक्रमांनी हे वर्ष साजरे करायला पाहिजे होते. मात्र सरकारी पातळीवर महात्मा फुलेंच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ना कोणता कार्यक्रम, ना कोणता उपक्रम…अशी स्थिती ११ एप्रिल रोजी आहे. सरकारकडूनच डोळेझाक झाल्यामुळे प्रशासकीय पातळीवरही सारा आनंदीआनंद आहे.
सरकारी पातळीवरुन अनास्था दाखविली असली तरी सामाजिक संघटनांनी, प्रगतशील विचाराच्या संस्थांनी एकत्र येत महात्मा फुलेंच्या द्विजन्मशताब्दीचा जागर सुरू केला आहे. त्यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. वास्तविक सरकारकडून या साऱ्या गोष्टी अपेक्षित होत्या. महाराष्ट्राची सामाजिक, प्रगतशील विचाराची जी वीण घटट बांधली आहे, ते ‘शाहू- फुले-आंबेडकर’ या विचारधारेने. महाराष्ट्रातील सगळयाच पक्षाचे नेते, राज्यकर्ते व्यासपीठावरुन या महामानवांच्या नावाचा जयघोष करतात. त्यांच्या विचारकार्यांशी नाते सांगतात. सध्या सत्तेत असलेल्या महायुतीतील मंत्री, नेतेही त्याला अपवाद नाहीत. ‘शाहू- फुले-आंबेडकर’ या महामानवांच्या विचारानुसार महाराष्ट्राची वाटचाल सुरू असल्याचे सांगतात. मात्र त्या महामानवांच्या विचारकार्याशी निगडीत शाश्वत कार्य करण्यासंबंधी पाऊल पडताना दिसत नाहीत अशा भावना समाजमनातून उमटत आहेत.
महात्मा फुले यांचे कार्य हे सर्वस्पर्शी. शिक्षण, सामाजिक, औद्योगिक, व्यापार, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा अशा विविध पातळीवर त्यांनी रचनात्मक आणि प्रेरणादायी काम केले. ११ एप्रिल १८२७ रोजी त्यांचा जन्म. कृतीशील विचारधारा ही त्यांची खासियत. त्यांनी शोषणाविरुद्ध आवाज उठविला, गुलामगिरीविरोधात बंड पुकारला. स्त्रीशिक्षणाचे महत्व जाणून शाळा काढल्या…सामान्य घटकांना माणूस म्हणून सारे न्याय हकक मिळाले पाहिजेत यासाठी संघर्ष करणारा हा महात्मा. समानतेसाठी झगडणारा. सामाजिक सुधारणेची सुरुवात स्वतपासून करत त्यांनी समाजासमोर एक मानदंड निर्माण केला. या महामानवाच्या २०० व्या जयंती निमित्त सरकारकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले असते. त्यांच्या विचारकार्याचा जागर घडविता आला असता पण तसे घडताना काही दिसत नाही.