शिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंत
schedule01 Jun 26 person by visibility 18 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आह. शिवेसना कायमच मराठा समाज बांधवासोबत आहे. मराठा समाजाच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. अंतरवाली सराटी आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारी पातळीवरुन ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये शिवसेनाही होती. असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
मंत्री सामंत म्हणाले, ‘मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके या दोघांनीही मराठा व ओबीसी समाजात वैर निर्माण होणार नाही यासंबंधीची दक्षता घ्यावी असे आवाहनही मंत्री सामंत यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आरक्षणप्रश्नी जरांगे यांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही यासाठी सरकार काम करत आहे.अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी जे आंदोलन केले त्याठिकाणी सरकारी प्रतिनिधी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इतर जण चर्चेसाठी गेले होते. त्या चर्चेत शिवसेना नव्हती हा गैरसमज आहे. याविषयी मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे फोनवरुन संपर्कात होते. मी ही, नेतेमंडळीशी चर्चा करत होतो. शिवाय तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला पहिल्यांदा दहा टक्के आरक्षणाचा निर्णय झाला होता.’पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम आदी उपस्थित होते.
………………
कोल्हापूरच्या राजकारणातील फरक कळेना
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंबंधी प्रश्न विचारले असता मंत्री सामंत म्हणाले, ‘मी, शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हयाचा संपर्कमंत्री आहे. रत्नागिरी जिल्हा हा कोल्हापूर लगतच आहे. मात्र कोल्हापुरात ‘कधी आमचं ठरलंय…कधी आपलं ठरलंय’ या पद्धतीचे जे राजकारण असते ते अजून आपणाला कळलेले नाही. अजून दहा ते पंधरा वेळा येऊन गेल्यानंतर ते राजकारण कळेल.’