जीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी घागर मोर्चा
schedule05 May 26 person by visibility 14 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधार गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामे आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ७ मे रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, कावळा नाका येथे धडक घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील करणार असून तेरा गावांतील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कणेरी जलशुद्धीकरण केंद्र येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना हाकलून लावल्यानंतर ग्रामस्थांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. चार वर्षांनंतरही केवळ सुमारे ५१ टक्केच काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उकरलेले रस्ते, वारंवार होणारी पाईपलाईन गळती आणि १०-११ दिवस पाणीपुरवठा बंद राहणे यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेली जुनी पाणीपुरवठा योजना देखील वारंवार बंद पडत असून गळती, मोटार पंप बिघाड आणि दुरुस्तीस विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे “नवीन योजना रखडली तरी चालेल; मात्र जुन्या योजनेतून तरी नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा,” अशी ठाम मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.