पोलिसांची पदभ्रमंती, पन्हाळगड - विशाळगड मोहिमेत १५० जणांचा सहभाग
schedule16 Aug 26 person by visibility 5 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एरव्ही मोर्चा, आंदोलनाच्या बंदोबस्तात उतरणारे, मंत्र्यांच्या दौऱ्यात सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे, कधी गुन्ह्यांच्या तपासात चौकशीसाठी ठिकठिकाणचा परिसर पालथा घालणारे…पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चौदा व पंधरा ऑगस्ट २०२६ या कालावधीत पदभ्रमंतीची वेगळी अनुभूती घेतली. पन्हाळा ते विशाळगड अशी ६५ किलो मीटरची पदभ्रमंती करत शिवकालीन इतिहास जाणून घेतला. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे या पदभ्रमंतीचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या ऐतिहासिक गकिल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये वीरांच्या शौर्याची असलेली परंपरा तसेच वीरांनी राष्ट्र निर्मितीसाठी दिलेल्या योगदान व बलिदानाची माहिती कळावी, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये साहसीवृत्ती निर्माण होवून त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता वाढीस लागावी या उद्देशाने मोहीम आयोजित केली होती. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता पन्हाळगड येथील नरवीर बाजीप्रभू देशपांडे चौक येथे मोहीमवीरांचे आगमन व एकत्रीकरण झाले. मोहिमेत पोलीस अधिकारी व अंमलदार मिळून १५० जण सहभागी झाले होते. त्यामध्ये तीस महिला पोलीस अंमलदारांचा सहभाग होता. त्यांना मोहिमेचा हेतू, युध्देतिहास व युध्दभूमी संक्षिप्तरित्या कथन करुन माहिती देण्यात आली.विशेश पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते वीरयोध्दे आणि दुर्ग भूमीपूजन करुन मोहिमेला प्रारंभ झाला. पदभ्रमंती ही पन्हाळगड ते कुंभारवाडी, कुंभारवाडी ते मांडलाईवाडी, मांडलाईवाडी ते करपेवाडी येथे येवून थांबली. त्या ठिकाणी ऐतिहासिक चर्चा, पावनखिंड संग्राम इतिहास कथन, शूरवीरांच्या कथा व परस्पर संवाद झाला. नंतर करपेवाडी येथे मुक्काम करण्यात आला.
शनिवारी, पंधरा ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता पुन्हा पदभ्रमंतीला सुरवात झाली. करपेवाडी येथून पाटेवाडी फाटा ते म्हालसवडे, धनगरवाडा ते पांढरपाणी असा प्रवास करत पावनखिंड ऐतिहासिक युध्दभूमीचे दर्शन घेवून भाततळी, सुखाई मंदिर घाटमार्गे केंभुर्णीवाडी ते गजापूर व गजापूर ते विशाळगड पायथ्याला आली. तेथून एकत्रित विशाळगडावरील मुंडा दरवाजा या ठिकाणी सायंकाळी ४.३० वाजता पोहोचली. तेथे मोहिमेत आलेल्या अनुभवाबाबत तसेच ऐतिहासिक स्थळांबाबत मोहिमवीरांनी आप आपली मनोगते व्यक्त केले. दरम्यान पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून मोहीम झाली