हार नको, बुके नको…केवळ पेन घेऊन भेटीस या ! महापौर रुपाराणी निकम यांनी दाखविले वेगळेपण!!
schedule07 Feb 26 person by visibility 197 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली की शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडते. पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गर्दी वाढते. हार, बुकेंचा तर वर्षाव होतो. अगदी सामान्य लोकही शेकडो रुपये खर्च करुन हार, बुके आणतात. त्यांना आर्थिक झळ बसते. नेमके हेच टाळण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या नूतन महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम यांनी अनोखे आवाहन केले आहे. त्यांनी, महापौरपदी निवड झाल्याबद्दल साऱ्यांचे आभार मानले. त्याचवेळी भेटीसाठी येणाऱ्यांना एक विनंती केली आहे की ‘कोणीही हार, बुके यासाठी पैसे खर्च करू नयेत. केवळ एक रुपयाचा पेन घेऊन भेटीस यावे.’ महापौर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी वेगळेपणाची चुणूक दाखविली आहे. भेटीसाठी येणाऱ्या लोकांकडून जमलेले पेन हे गरीब विद्यार्थी व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेत सभागृहात दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत असलेल्या निकम यांनी अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केली आहे. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत त्या स्वातंत्रसैनिक कॉलनी या प्रभागातून निवडून आल्या होत्या. २०१५ ते २०२० या सभागृहात त्यांनी विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करत अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. शहर विकासाच्या योजनेवरील चर्चेत सहभाग ठरलेला असायचा. त्या सभागृहात विरोधी बाकावरील सदस्या असूनही त्यांनी सभागृहात वेगळी छाप पाडली होती. यंदा झालेल्या जानेवारी २०२६ मधील महापालिका निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक अठरामधून विजयी झाल्या. मतदारांनी, त्यांना सर्वसाधारण गटातून निवडून दिले. भारतीय जनता पक्षाकडून त्या निडून आल्या आहेत. महायुतीकडे महापालिकेत बहुमत आहे.
महायुतीच्या त्या पहिल्या महापौर ठरल्या. त्यांच्या रुपाने महापालिकेत भाजपाचा महापौर झाला. त्यांनी ‘महापौर जनतेच्या दारी’हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिन्याच्या पाच तारखेला महापालिका चौकात हा जनता दरबार होईल असे त्यांनी घोषित केले आहे. त्या, महापौर झाल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार, बुके घेऊन लोक भेटण्यासाठी येत आहेत. यामध्ये सामान्य कार्यकर्ते, नागरिकांचा समावेश आहे. यावर होणारा खर्च टाळण्यासाठी महापौर निकम यांनी आवाहन केले आहे, ‘कोणीही हार बुके यासाठी पैसे खर्च करू नयेत. केवळ एक रुपयाचा पेन घेऊन भेटीस यावे.’ शुभेच्छा रुपात जमलेले पेन हे महापालिका शाळेतील मुलांना, गरीब मुलांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.