आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफ
schedule18 Apr 26 person by visibility 72 categoryउद्योग
दूध खरेदी दरात उच्चांकी वाढ, ठेवी ५०० कोटीवर, वार्षिक उलाढाल ४१०० कोटीहून अधिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. संचालक मंडळ हे विश्वस्त म्हणून काम करते. गेल्या पाच वर्षात दूध उत्पादकांना न्याय देताना खरेदी दरात उच्चांकी वाढ दिली. दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीतून गोकुळला मिळणाऱ्या पैशाचा विनियोग हा दूध उत्पादकांच्या हितासाठीच खर्च केला जातो.’असे स्पष्टीकरण गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिले. तसेच आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळसंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यासंदर्भात संचालक मंडळ चर्चा करायला तयार आहे.’असेही चेअरमन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना भेटणे सुरुच आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनाही फोन केला होता. त्यांचा निरोप आला की त्यांच्याशी चर्चा करू.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे.’असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात संचालक मंडळाने केलेल्या कामकाज, दूध उत्पादकांसाठी राबविलेल्या योजना, दूध खरेदी दरात वाढ यासंबंधीची माहिती दिली. मुश्रीफ म्हणाले, ‘गेल्य पाच वर्षात संचालक मंडळाने दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कामकाज केले.
गोकुळच्या माध्यमातून पाच वर्षापूर्वी गोकुळचे दूध संकलन बारा लाख लिटर होते. आता ते सोळा लाखावर पोहोचले आहे. सरासरी चार लाख दूध संकलन वाढ झाली आहे. पाच वर्षापूर्वी गोकुळच्या ठेवी २५० कोटी होत्या. आता त्या ५५० कोटीहून अधिक झाल्या आहेत. पुणे, मुंबई येथे दूध विक्रीत वाढ झाली. २०२१ मध्ये गोकुळची आर्थिक उलाढा २५५१ कोटी होती आता वार्षिक उलाढाल ४१०० कोटी रुपयांपर्यत वाढली. सोलापूर, करमाळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला. यामुळे वीज बिलात सहा कोटीची बचत होणार आहे.’
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याकडे चेअरमन मु्श्रीफ यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘गोकुळच्या पैशाचा विनियोग हा दूध उत्पादकांच्या हितासाठीच खर्च केला जातो. त्यांनी कधीही वेळ द्यावा, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चा व खुलासा करायला तयार आहोत.’असेही ते म्हणाले. गोकुळ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. गोकुळची बदनामी होईल अशी वक्तव्य साऱ्यांनीच टाळावीत.’ पत्रकार परिषदेला संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, रणजित पाटील, चेतन नरके, अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर, युवराज पाटील, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.