जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी. डी. पाटील यांचे निधन
schedule04 Nov 25 person by visibility 31 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील कूर येथील ज्येष्ठ नेते, माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडूरंग दत्तात्रय तथा पी. डी. पाटील यांचे मंगळवारी (चार नोव्हेंबर २०२५) निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने राजकारणातील अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दांत हळहळ व्यक्त होत आहे. ते मामा या नावांनी परिचित होते. मंगळवारी रात्री नऊ वाजता कूर येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रक्षाविसर्जन गुरुवारी, सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील व कूर गावचे सरपंच मदन पाटील यांचे ते वडील होतं.
एक तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून पी. डी. पाटील यांची ओळख होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९३९ रोजी झाला. त्यांनी कोल्हापूर येथे जुनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. कूर ग्रामपंचायतीच्या १९६७ मधील पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नऊ पैकी आठ जागा जिंकत सत्ता मिळवली. तत्पूर्वी, १९६० मध्ये सरवडे येथील तत्कालीन बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव पाटील यांच्या भगिनी जिजाबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
कूर ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर १९६७ साली झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पी.डी. मामांनी आपल्या नेतृत्वाखाली ९ पैकी ८ जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली सरपंच म्हणून निवड झाली. त्यांनी, १९६७ ते १९७२ या कालावधीत गावात पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला होता. त्यांनी पुढाकार घेऊन, भैरवनाथ विकास सेवा संस्था स्थापन केली. चेअरमन म्हणून प्रभावी कामगिरी केली. १९९५ मध्ये राम विकास सेवा संस्था आणि राम सहकारी दूध संस्था सुरू केली. याशिवाय पी.डी. पाटील फाउंडेशनची स्थापना करुन समाजातील विविध घटकांना मदतीचा हात दिला. तत्पूर्वी त्यांनी, जनता दलातर्फे १९९२ मध्ये आकुर्डे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. काँग्रेसचे तत्कालीन आमदार हरिभाऊ कडव यांनी त्यांची एमएससीबी जिल्हा सदस्यपदी नियुक्ती केली होती.माजी आमदार बजरंग देसाई यांच्या दुसऱ्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्या पाठीशी राहिले त्यांच्या विजयात योगदान होते.