शाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना साद
schedule27 Apr 26 person by visibility 16 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शाहूवाडी तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीमध्ये कोल्हापूरच्या उद्योजकांनी मोठया प्रमाणात गुंतवणूक करावी. जवळपास ७५० एकर परिसरात शाहूवाडी तालुक्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यात येणार आहे.’अशी साद पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी घातली. नागपूर येथे टोयाटो कंपनी २५० एकर परिसरात प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. त्या ठिकाणी कंपनीला शक्य नसेल तर शाहूवाडीत त्यांना आम्ही जागा उपलब्ध करुन द्यायला तयार आहोत. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
निमित्त होतं, ‘शाश्वत आणि सर्वांगिण विकास’हे सूत्र स्वीकारुन शहर आणि जिल्हयाच्या विकासासाठी कार्यरत ‘कोल्हापूर फर्स्ट’या संस्थेच्या वर्षपूर्तीचे. ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा, विकासकामासाठी लोकप्रतिनिधींचा गौरव, तसेच भविष्यातील नियोजन व दिशा यासंबंधी चिंतनपर चर्चा करण्यासाठी रविवारी कोल्हापुरात विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी संस्थेची ध्येय उद्दिष्टे स्पष्ट केली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार कोरे, आमदार अशोकराव माने यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हापुरातील कारखानदारांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविले. हॉटेल पॅव्हेलियन येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जितेंद्र गांधी, ऋतुराज इंगळे, अण्णासाहेब चकोते यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
‘शाहूवाडी तालुक्याचे मार्केटिंग करण्यासाठी मी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे.’असे प्रारंभीच नमूद करत आमदार कोरे यांनी उपस्थित कारखानदार, उद्योजकांशी संवाद साधला. कोरे म्हणाले, ‘विकासाचा मानदंड हा आर्थिक प्रगतीच्या क्षेत्रावर मोजला जातो. कोल्हापूर फर्स्टचा उपक्रम हा कोल्हापूरच्या विकासासाठी सकारात्मक विचाराचे व्यासपीठ आहे. राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून शहराची केलेली पायाभरणी, कोल्हापुरातील पोषक वातावरण, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण, येथील मातीतील संस्कार आणि उद्यमशीलतेचे गुण, सर्किट बेंचची स्थापना, रेल्वे व हवाई कनेक्टिव्हिटी यामुळे कोल्हापूर हे राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.गुंतवणूक व उद्योगक्षेत्रात कोल्हापूर अग्रेसर आहे. विकासाचा हा चढता आलेख ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी उपयुक्त ठराव. कोल्हापुरातील उद्योजक व कारखानदारांनी शाहूवाडीतील प्रस्तावित एमआयडीत गुंतवणूक करावी. त्यांना सगळया सुविधा पुरवू. नागपूर- रत्नागिरी हायवे झाल्यानंतर कोल्हापुरातील ३५ मिनिटात शाहूवाडीतील एमआयडीसीत पोहोचता येईल. उद्योजकांनी, शाहूवाडीतील एमआयडीतील गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना त्यासाठी आवश्यक भूखंडासह विविध सुविधा पुरवू.’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर हे सर्वच क्षेत्रात राज्यात व देशात आघाडीवर असावे यासाठी कोल्हापूर फर्स्ट प्रयत्नशील आहे. कोल्हापूर फर्स्टच्या विविध संकल्पना मूर्त रुपात येत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शहराचा विकास साधावा.’आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर फर्स्ट ही संस्था कोल्हापूर शहराच्या विकासाच्या जबाबदारीची जाणीव करुन देणारी आहे. महायुतीची सत्ता आल्यापासून कोल्हापुरात विविध विकास प्रकल्प मंजूर झाले. सर्किट बेंचची स्थापना, आयटी पार्कसाठी जागा हस्तांतरण, २६२ कोटी रुपयांच्या कन्व्हेन्शियन सेंटर, पूर नियंत्रण प्रकल्पासाठी ३२०० कोटी रुपयांची तरतूद, करवीर निवासिनी अंबाबाई व जोतिबा मंदिर विकास आराखडा अशा विविध योजनेतून शहर व जिल्हयाच्या विकासाचा महत्वाचा टप्पा गााठला आहे.’
कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व राजकीय नेतृत्व व प्रशासनाशी संवाद
कोल्हापूर फर्स्टचे समन्यवक सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक करताना वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘सर्व राजकीय नेतृत्व व प्रशासनाशी संवाद साधत कोल्हापूरचा विकास साधणे हाच अजेंडा आहे. राज्यकर्ते, प्रशासन, नागरिक व प्रसारमाध्यमे यांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करायची आहे. कोल्हापूर, सांगली , सातारा असा धार्मिक व पर्यटनाचे सर्किट तयार व्हावे, जेणेकरुन तीनही जिल्हयाच्या आर्थिक विकासाला गती लाभेल.’ याप्रसंगी कोल्हापूर फर्स्टचे व्हाइस चेअरमन अॅड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील,इंजिनीअरिंग असोसिएशनचे कमलाकांत कुलकर्णी, नितीन वाडीकर, डॉ. गिरीश वझे, विद्यानंद बेडेकर, अॅड. व्ही. आर.पाटील, हॉटेल मालक संघटनेचे सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, मोहन कुशिरे,सीए आशिष सेवेकर, आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे, राहूल मेंच, रणजीत नार्वेकर, विश्चजीत देसाई, अश्विनी दानिगोंड, अजय कोराणे, विनोद कांबोज, सचिन बीडकर आदी उपस्थित होते.पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.