शिक्षण विभाग करणार शाळांची अचानक तपासणी ! तर मुख्याध्यापकांवर कारवाई !!
schedule25 Jul 25 person by visibility 7853 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नाव शाळेत आणि हजेरी अॅकेडमीमध्ये या प्रकाराला चाप बसविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग आता जिल्ह्यातील शाळांची अचानक तपासणी करणार आहे. या शाळा तपासणीत विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत कमी असेल आणि संबंधित विद्यार्थी जर अॅकेडमीत प्रवेश घेतले असतील तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी ऑगस्ट महिन्यात शाळा तपासणी होणार असल्याचे सांगितले.
विविध माध्यमाच्या मिळून जिल्ह्यात माध्यमिक शाळांची संख्या १०८३ च्या आसपास आहे. दरम्यान शाळेत प्रवेश घेतलेले असंख्य विद्यार्थी वर्गात उपस्थित न राहता अॅकेडमीत शिकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शालेय वेळेत विद्यार्थी शाळा बाहेर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारच्या परीक्षेच्या तयारीसाठी अॅकेडमीत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील सगळया माध्यमिक शाळांना पत्र पाठवून प्रवेश घेतलेले विद्यार्थी शालेय वेळेत वर्गात उपस्थित राहतील यासंबंधी दक्षता घ्यावी असे कळविले होते. शाळेतील विद्यार्थी शालेय वेळेदरम्यान अॅकेडमीमध्ये असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकीय कारवाई होईल असे नमूद केले होते. माध्यमिक शिक्षण विभागाने आता शाळा तपासणी करण्याचे ठरविले आहे. अचानक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली जाईल.