भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाह
schedule20 Jun 26 person by visibility 98 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : ‘‘करवीरनिवासिनी अंबाबाईचे वास्तव्य असलेल्या या नगरीतून मी देशवासियांना आश्वस्त करतो की, भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, कुणीही यावे आणि वास्तव्य करावे. एक-एक घुसखोर शोधू आणि त्यांना देशाबाहेर घालवू. जे या भूमीत जन्मले तेच या देशात राहतील’असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भरला.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारने जवळपास १५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यानिमित्त गृहमंत्री शाह यांचा नागरी सत्कार आणि जाहीर सभा असा संयुक्त कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित केला होता. कसबा बावडा रोडवरील पोलिस मैदान येथे शनिवारी, २० जून २०२६ रोजी आयोजित या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आशिष शेलार, खासदार धनजंय महाडिक, खासदार धैर्यशील माने, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार जयश्री जाधव, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली.
या सभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. काँग्रेस व ठाकरे हे घुसखोरांचा व्होटबँक म्हणून वापर करत आहेत. मात्र आम्ही, एक – एक घुसखोर शोधून त्यांना देशाबाहेर घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’असा इशाराच त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहत गृहमंत्री शाह म्हणाले, ‘यापूर्वी शिवसेना शिंदे गट असा उल्लेख केला जायचा. आता कुठलाही गट वगैरे काही उरला नाही. आता शिंदे हे नेतृत्व करत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.’
शाह म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे पर्व सुरू आहे. विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. गेल्या बारा वर्षात पायाभूत सुविधा, दळणवळण, मेट्रो सुविधा, चांद्रयान मोहिम, तीर्थक्षेत्रांच्या जिर्णोद्धारातून सांस्कृतिक पुनरुथ्थान अशा विविध टप्प्यावर काम सुरू आहे. देशातील जनतेचा विश्वास मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आहे. पश्चिम बंगाल कसे जिंकणार असे सारे म्हणत होते. मात्र बंगालमधील जनतेने आशीर्वाद देत भाजपच्या हाती सत्ता सोपविली. आता त्या ठिकाणी एकही घुसखोर राहणार नाही.’