डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके यांना पुरस्कार
schedule20 Jul 26 person by visibility 60 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : चंद्रपूर येथील इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक व संशोधक स्व. डॉ. जया द्वादशीवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साहित्य, संस्कृती, समाजकार्य आणि अध्ययन या क्षेत्रांत आपले नाव ठळकपणे उमटविणाऱ्या महिलांना पुरस्कृत केले जात असते. जया द्वादशीवार स्मृती सन्मान, २०२६ च्या सन्मानासाठी डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम व वर्षा ढोके या चार लेखिका-सामाजिक कार्यकर्त्यांची निवड झाली आहे. त्यांना या वर्षीचा जया द्वादशीवार स्मृती सन्मान प्रदान केला जात आहे. त्यात सन्मानचिन्हासह कृतज्ञता निधी आणि ग्रंथ यांचाही समावेश आहे. हा सन्मान सोहळा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राममध्ये गुरूवारी २३ जुलै २०२६ या दिवशी संध्याकाळी ५ वाजता मुक्त पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्या उपस्थितीत होत आहे.
डॉ. मेघा पानसरे या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून परकीय भाषा विभागाच्या प्रमुख म्हणून अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. त्या रशियन भाषा आणि साहित्याच्या अभ्यासक संशोधक असून त्यांची अनेक भाषांतरे व स्वतंत्र पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. श्रीमती कुसुम अलाम या गडचिरोली येथील आदिवासी कवयित्री लेखिका आहेत. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणार्थ देशभरात झालेल्या लढ्यात त्या अग्रेसर राहिलेल्या आहेत. डॉ. ऐश्वर्या रेवडकर या वैद्यकीय सेवेचे कार्य करणाऱ्या वैद्यकीय संशोधक असून, स्त्रियांचे आरोग्य आणि लैंगिकता या विषयासंबंधी त्यांचे विशेष कार्य आहे. विशेषत: महाराष्ट्र व छत्तीसगड मधील आदिवासी क्षेत्रात त्यांनी आरोग्यविषयक जन-जागरणाचे कार्य केले आहे. वर्षा ढोके या विदर्भातील एक अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या कवयित्री आणि लेखिका आहेत. सामाजिक जाणीवेतून त्या अनेक परिवर्तनवादी चळवळीशी जोडल्या गेलेल्या आहेत.