समाजशास्त्र परिषदेत जीवनगौरव पुरस्कार प्रदान ! डॉ. रमेश जाधव, आर. बी. पाटील, एन.डी.जत्राटकर, एस. डी. अकोळेंना पुरस्कार
schedule22 May 23 person by visibility 492 categoryसामाजिक

शहाजी महाविद्यालयातील समाजशास्त्र परिषदेत जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या 75 वर्षात महिलांच्या क्षमतांना हिमनगासारखा केवळ 20 टक्केच वाव मिळाला आहे. 80 टक्के त्या पाण्याखालील हिमनगासारख्या आहेत. महिलांच्या या क्षमतांना वाव मिळाला तर त्या हिमालयासारख्या दिसतील व समाज अधिक सुदृढ बनेल, विकसित होईल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषदेचे चौदावे अधिवेशन झाले. अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन झाले.
समाजशास्त्र परिषदेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ.रमेश जाधव, प्रो. आर. बी. पाटील, डॉ. एन. डी.जत्राटकर, प्रो. एस.डी.अकोळे यांना प्रदान करण्यात आला. समाजशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक एस. एन. पवार यांचे हस्ते पुरस्कार वितरण झाले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा परदेशी यांनी स्त्रियांच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजना यांचा उहापोह केला. परिषदेचे समन्वयक डॉ. के.एम.देसाई यांनी स्वागत केले.
परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी समाजशास्त्र परिषदेसाठी २५ हजार रुपयेयांची देणगी घोषित केले. जीवन गौरव पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांनीही प्रत्येकी दहा हजार रुपयांची देणगी समाजशास्त्र परिषदेस दिली.
समाजशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठात प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तसेच पीएच.डी.प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झालेल्या प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे , मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे उपक्रमास सहकार्य मिळाले.