आधुनिक तंत्रज्ञानाने आरोग्य सेवा दर्जेदार करणे ही काळाची गरज- डॉ.चंद्रशेखर बिरादर
schedule08 Dec 25 person by visibility 44 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ‘माती व माणसाचे आरोग्य दर्जेदार, शाश्वत ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य त्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. तंत्रज्ञानातील कमतरता किंवा आपण ज्यात मागे आहोत त्या सर्व विषयात या तरुणाईने काम करून भारताला विकसित देश करण्यामध्ये योगदान दिले पाहिजे.आपले विकसित तंत्रज्ञान संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपणच दिले पाहिजे. भारताचे पर्यावरण शेती व शेतीवर आधारित उद्योग हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार तसेच गतिमान करण्याबाबतीत कार्य करा.’असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ उद्योजक डॉ.चंद्रशेखर बिरादर यांनी केले.
भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोवेशन सेल्स च्या पुढाकाराने व एआयसीटीई च्या सहकार्याने ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’- २५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयात येथे झाले. या दोन दिवसीय स्पर्धेसाठी अकरा राज्यातून २८ महाविद्यालयातून आलेले १७० स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे २५ मार्गदर्शक उपस्थित आहेत. केआयटी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ झाला.
उद्घाटनप्रसंगी केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी म्हणाले, “जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. भारतासहित अमेरिका, जपान, जर्मनी, चीन या सर्व देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात जी आधुनिकता आलेली आहे ती तेथील विद्यापीठातून सतत चालू असणाऱ्या संशोधनाचा व ते संशोधन प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणाऱ्या टेक्नोसेव्ही तरुणाईच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. ’
संस्थेचे अध्यक् साजिद हुदली यांनी कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था भक्कम असेल तर तो देश सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इनोव्हेशनच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवून गांभीर्याने काम केले पाहिजे. जेणेकरून आपली शेतकऱ्याची, समाजाची व देशाची आर्थिक उन्नती होईल. अशा स्पर्धांच्या आयोजानातून तरुणाईवरील विश्वास व तरुणाईचा आत्मविश्वास हे दोन्ही वृद्धिगंत होणार आहे.’ प्रा.श्रुती काशीद व प्रा.शुभदा सावरखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष हुदली यांच्या हस्ते करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची प्रतिमा देऊन करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, स्पर्धा केंद्राच्या एआयसीटीच्या प्रतिनिधी श्रीमती आकांक्षा शेजाळ, स्पर्धेचे संयोजक प्रा.अजय कापसे, सह-संयोजक प्रा प्रवीण गोसावी उपस्थित होते.