एलआयसीमुळे चांगली माणसे भेटली-मुरलीधर गावडे
schedule06 Mar 25 person by visibility 230 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ एलआयसीमुळे मला अनेक चांगली माणसे मिळाली, जनसंपर्क वाढला आहे. मित्र परिवार, कुटुंबीय व सर्वांच्या सहकार्यामुळेच मी ३५ वर्षाची सेवा पूर्ण करु शकलो. मी जरी सेवानिवृत्त होत असलो तरी मी एलआयसीचा एक भाग म्हणून राहणार आहे. यापुढेही आपणास सर्वांचे सहकार्य असेच मिळत राहावे.’अशा भावना विकास अधिकारी मुरलीधर गावडे यांनी व्यक्त केल्या.
भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा ९४ एलच्या ६८२६ च्या सर्व विमाप्रतिनिधीं मार्फत विकास अधिकारी मुरलीधर गावडे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्व विमा प्रतिनिधींच्यावतीने हितेंद्र साळुंखे, नानासाहेब पाटील,प्रदीप गिजरे, सुवर्णा पाटील यांच्या हस्ते गावडे व प्राचार्या शुभांगी गावडे यांचा शाल, श्रीफळ,पोशाख पुष्पगुच्छ् देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराप्रसंगी बोलताना मुरलीधर गावडे म्हणाले, ‘माझे गुरु, माझे जीवलग मित्र, सल्लागार, माझ्या दृष्टीने सर्व काही म्हणजे माझे वडील स्वर्गीय बाबा गावडे यांच्यामुळेच मी एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करु शकलो. या विभागाचा अविभाज्य भाग बनलो. उद्यापासून माझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी पण तुमच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी राहाव्यात. ’
माजी मुख्याध्यापक नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, सर्व विमा प्रतिनिधी विमा क्षेत्रातील व्यवसाय वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्यांचा अभ्यास करुन अद्ययावत विमा सेवा ग्राहकांना द्याव्यात. याप्रसंगी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, गौरव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मनोज शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी विमा प्रतिनिधी व गावडे कुटूंबीय उपस्थित होते.