वाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे
schedule22 Apr 26 person by visibility 11 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘एखाद्या गावात मंदिर असो वा नसो, मात्र तिथे सुसज्ज वाचनालय असणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात आणि ज्या गावातील लोक विचार करू लागतात, त्या गावाचा उद्धार कोणीही रोखू शकत नाही. खऱ्या अर्थाने वाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ आहे," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील श्री आळोबानाथ मोफत वाचनालय संस्थेच्या 'कै. सौ. इंदूबाई वसंतराव पाटील संकुल' या नवीन इमारतीचा, अभ्यासिकेचा व हनुमान व्यायाम मंदिराचा उद्घाटन समारंभ जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सोहळ्यात वाचनालय इमारतीचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते तर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील व संजीवनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पाटील यांच्या हस्ते हनुमान व्यायाम मंदिराचे उदघाटन झाले.
आमदार विनय कोरे म्हणाले की, "वाचन हे आयुष्यभर चालणारे व्रत आहे. येथील नागरिकांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने हा जो ज्ञानाचा यज्ञ पेटवला आहे, तो आयुष्यात कधीही विझू देऊ नका. हा यज्ञ कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. ही वास्तू गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा कणा ठरेल." डॉ. चंद्रशेखर पाटील म्हणाले , ‘आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदव्या असून चालणार नाही, तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. त्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. गावात वाचनालय आण व्यायामशाळा असणे ही काळाची गरज आहे.’ कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, पंचायत समिती सदस्य माणिक पाटील, वारणा कारखान्याचे संचालक उदय पाटील, डॉ. गिरीश पाटील, लता शिंदे, कराडचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे उपस्थित होते.