कोल्हापुरात आठ - नऊ डिसेंबरला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ! स्पर्धेचे नोडल सेंटर म्हणून केआयटीला चौथ्यांदा मान !!
schedule05 Dec 25 person by visibility 43 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्चशिक्षित विद्यार्थी वर्गाकडून विविध विषयातील प्रश्न मार्गी लावावेत, स्टार्टअपच्या नवनवीन संकल्पना साकार व्हाव्यात हा उद्देश ठेवून भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यातर्फे आठ आणि नऊ डिसेंबर २०२५ रोजी येथील केआयटी कॉलेजमध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन उपक्रम आयोजित आहे. या स्पर्धेसाठी अकरा राज्यातील २८ महाविद्यालयातील टीम सहभागी होणार आहेत. सलग ३६ तास ही स्पर्धा चालणार आहे. केआयटी कॉलेजमध्ये या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली. केआयटीला सलग चौथ्या वर्षी हॅकॅथॉनचे नोडल सेंटर म्हणून मान मिळाला, ही संस्थेसाठी अभिमानस्पद आहे.असे स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा. अजय कापसे, सहसंयोजक प्रा. प्रवीण गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेमध्ये एकूण १०७ विद्यार्थी, ६१ विद्यार्थिनी मिळून १६८ स्पर्धक आहेत. सहा विभागातून होणाऱ्या स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व अनुभवी १८ मान्यवरांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्लोबल ग्रीन ग्रोथ बेंगळूरचे संस्थापक डॉ. चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते व नेलसॉफ्टचे प्रसन्न डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी टाटा ऑटो कॉम्प ह्यूमन रिसोर्सचे उपाध्यक्ष संदीप जोशी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी सहा प्रश्नांचे सहा विभाग आहेत. विजेत्या संघाला दीड लाख रुपयांचे पारितोषिक आहे. यंदा अंतिम स्पर्धेसाठी कृषी मंत्रालयाने सहा प्रश्नांवर उत्तरे शोधून सादर करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना दिली आहे. सहा समस्या एकत्रितपणे तेलबिया पिकांचे उत्पादन, आयात, शेतकऱ्यांच्या हितासाठी डिजीटल साधने तयार करणे यावर केंद्रीत आहेत. ही स्पर्धा आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेला प्रा. अमित वैद्य, प्रा. निखिलेश सौंदत्तीकर उपस्थित होते.