स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !
schedule18 Feb 26 person by visibility 126 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महापालिका निवडणूक झाली,गटनेते नेमले. पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. आता स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरू झाले. वीस फेब्रुवारी रोजी महापालिकेची सभा आहे. त्या सभेसमोर, आयुक्तांकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावांची शिफारस होईल. मात्र त्यापूर्वीच स्वीकृतवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१५ मधील निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीदरम्यान माजी महापौर सुनील कदम यांच्या सभागृहातील प्रवेशाला ब्रेक लावण्याच्या प्रकार घडला होता. त्या राजकारणाचे उट्टे काढण्याच्या पावित्र्यात आता कदम दिसत आहेत. गेल्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. आता भाजप, शिवसेनेचे बहुमत आहे. काँग्रेसकडून स्वीकृतसाठी अर्ज दाखल केलेल्या माजी नगरसेवक सुनील मोदी यांच्या नावाला विरोध करत मागील राजकारणाची परतफेड करण्याची रणनिती आखली जात असल्याचे वृत्त आहे.
सभेला दोन दिवसाचा कालावधी उरला आहे. घोडे मैदान जवळ आहे. महायुतीने जर विरोधाचा पवित्रा घेतला तर सभेच्या प्रारंभालाच सत्ताधारी आणि विरोधकांत ठिणगी पडणार आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील राजकीय ईर्षा अद्याप शमली नसल्याचे चित्र आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या नावावर नजर टाकली तर सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय डाव काय आहेत हे स्पष्ट जाणवते. सभागृहातही आपली बाजू कमकुवत होणार नाही या पद्धतीने या निवडी केल्या आहेत. २०१५ ते २०२० या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता होती. काँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे चौदा तर शिवसेनेचे चार सदस्य होते. तर विरोधी आघाडीकडून ताराराणी आघाडीचे १९ तर भाजपचे १४ असे एकूण ३३ नगरसेवकांचे संख्याबळ होते. तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. २०१५ मधील निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून प्रा. जयंत पाटील, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली. ताराराणी व भाजप आघाडीकडून माजी महापौर सुनील कदम व किरण नकाते यांचे अर्ज होते. सभागृहात सुनील कदम वगळता इतर चौघांच्या नावाला मान्यता दिली. तर कदम यांच्या अर्जाला सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदविला.
कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करायची की नाही यावरुन सत्ताधारी व विरोधक सभागृहात आमनेसामने उभे ठाकले. जवळपास सात ते आठ महिने हा वाद धुमसत होता. प्रत्येक सभेला हा विषय अजेंडयावर. आणि या विषयावरील चर्चेवेळी सभागृहाला कोर्टासारखे स्वरुप प्राप्त होई. वाद, प्रतिवाद ठरलेला. सत्ताधाऱ्यांकडून तत्कालिन नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर तर विरोधी आघाडीकडून नगरसेविका रुपाराणी निकम बाजू मांडत. सत्ताधाऱ्यांकडून त्यावेळी प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुखही किल्ला लढवायचे. तर विरोधी आघाडीकडून सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी हे लढायचे. कधी मराठी, कधी इंग्रजीत हा वाद रंगला. खडाजंगी तर ठरलेली. एकदा तर हा विषय मतदानापर्यंत पोहोचला. अखेर प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. कोर्टाने कदम यांची निवड योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर सभागृहात प्रवेश केलेल्या माजी महापौर कदम यांनी संधी मिळेल तेव्हा सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.
आता महापालिकेतील राजकारण पालटले आहे. सत्तेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आहे. सत्ताधारी पक्षात आता प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख आहेत. आणि काँग्रेस विरोधी बाकावर आहे. काँग्रेसकडून स्वीकृतसाठी जी तीन नावे सादर झाली आहेत, त्यापैकी सुनील मोदी यांच्या अर्जाला सत्ताधाऱ्यांकडून विरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोदी हे विरोधी आघाडीतील थिंक टँक म्हणून ओळखले जातात. ते शिवसेनेचे पदाधिकारी असले तरी ते काँग्रेसच्याही जवळचे आहेत. ज्या कारणास्तव कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी तेव्हा विरोध झाला होता तसेच कारण आता सत्ताधारी मंडळी हे मोदी यांच्या अर्जासाठी पुढे करत त्यांचा सभागृहातील प्रवेश सहजासहजी होणार नाही यासाठी खेळी करण्याच्या पावित्र्यात आहेत. या साऱ्या प्रकरणात महापौरांना विशेषाधिकार असतो. सध्या महापालिकेत महायुतीची सत्ता आहे आणि महापौर हा भाजपाचा आहे.
.