अहिंसा-सत्य -अस्तेय ही मूल्ये आजच्या समाजाची अपरिहार्य गरज — डॉ. सुषमा रोटे
schedule20 Feb 26 person by visibility 6 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत ढासळत्या मानवी मूल्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी कुटुंब, शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर सजग प्रयत्न होणे आवश्यक आहे. जैन साहित्यातील अहिंसा, सत्य आणि अस्तेय या मूल्ये महत्वाची आहेत.’असे मत श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संस्थेच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे यांनी व्यक्त केले.
एकविसाव्या शतकातील हिंदी साहित्यातील मानवी मूल्ये या समकालीन व चिंतनशील विषयावर महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील हिंदी विभागाच्या वतीने एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र तसेच शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांचे दहावे अधिवेशन उत्साहात झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. बीजभाषक डॉ. संदीप रणभीरकर यांनी ‘उपभोक्तावादी व बाजारवादी मानसिकतेमुळे विश्वबंधुत्वाची परंपरा बाधित होत आहे. संत परंपरेतील करुणा आणि मानवतेची जागा आज असंवेदनशीलतेने घेतली असल्याने मानवी मूल्यांचा नव्याने विचार होणे अत्यावश्यक आहे. करुणा, सहानुभूती, सत्य आणि अहिंसा ही मूल्ये केवळ पुस्तकात न राहता आचरणात उतरवावीत, ’असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी डॉ. शशिकला राय यांनी एकविसाव्या शतकातील हिंदी कवितेतील मानवी मूल्यांचा आढावा घेतला, डॉ. गिरीश काशिद यांनी हिंदी कथा साहित्याच्या बदलत्या प्रवाहांचा धांडोळा मांडला. प्रा.डॉ. सुनील बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांनी वर्तमान समाजातील ढासळत्या मूल्यव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत मूल्याधिष्ठित समाजरचनेसाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन केले. डॉ. प्रकाश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रविदास पाडवी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुषमा चौगुले व प्रा. माधुरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता कुरळे यांनी आभार मानले.