प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत
schedule05 Jun 26 person by visibility 20 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या’असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. राजर्षी शाहू छत्रपती सभागृह येथे कार्यशाळा झाली. अध्यक्षा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बांधकाम समिती सभापती सारीका य.नांदेकर, समाज कल्याण समिती सभापती श्रध्दा अ. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘घनकचरा व्यवस्थापन फक्त ग्रामस्थांची जबाबदारी नाही तर लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या समन्वयाने गाव स्तरावर काम केल्यास यामध्ये निश्चितच यश मिळेल.’मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी कचरा व्यवस्थापनाच्या सोप्या आणि कमी खर्चिक पद्धती व पर्याय ग्रामस्थांपर्यंत पोहचविल्यास गावे नक्कीच स्वच्छ व कचरामुक्त होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमावलींची माहिती दिली. कार्यशाळेमध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट काम केलेले ग्रामपंचायत अधिकारी संजय शिंदे, श्रीमती सुरेखा आव्हाड, श्रीमती गीता कोळी यांनी घनकचरा व्यवस्थापन विषयक सादरीकरण केले.