महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील प्रसिध्द अक्षर दालन या ग्रंथ विक्री केंद्राचे संचालक रविंद्रनाथ जोशी यांना पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाचा दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथे गुरूवारी ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता एस. एम. जोशी सभागृहामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून गीतकार प्रविण दवणे आणि कोहिनुर समुहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अभिजित जोग यांच्या ब्रॅंडनामा २.० या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. जोशी हे गेली ५२ वर्षे ग्रंथवितरण क्षेत्रात कार्यरत आहेत. मुळचे सांगली जिल्ह्यातील औंदूबर येथील जोशी हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. यानंतर त्यांनी गुलमोहर बुक डेपोमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे शालेय आणि ललित पुस्तकांची विक्री सुरू केली. जिल्ह्यातील बाराही तालुक्यात गावागावांमध्ये, शाळांमध्ये जावून त्यांनी पुस्तकांची विक्री केली.
यानंतर त्यांनी २००५ मध्ये कोळेकर तिकटी येथे अक्षर दालन नावाचे ग्रंथदालन सुरू केले. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रेसर दालन म्हणून याचा उल्लेख होत असून अनेक मान्यवर साहित्यिक आणि कलाकारांनी दालनाला भेट दिली आहे. निर्धार प्रतिष्ठानच्या सहकार्याने गेली १२ वर्षे सुरू असलेला अक्षर गप्पा हा उपक्रम हे दालनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.