स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर ! शक्य असेल तिथं युती, शक्य नसल्यास स्वतंत्र !!-देवेंद्र फडणवीस
schedule11 Oct 25 person by visibility 141 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती करण्यासंबंधी स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत. जिथं शक्य असेल तिथं महायुती आणि शक्य नसेल तर स्वतंत्रपणे. दरम्यान ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार चर्चा सुरू आहे. युती होत आहेत. योग्य निर्णय होईल असा विश्वास आहे. दरम्यान महायुती नसेल तर मित्रपक्षावर टीका करायची नाही, अशा स्पष्ट सूचना आहेत.’असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी विभागनिहाय दौरे सुरू आहत. यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकींचा आढावा घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी यांचा मेळावा पुणे येथे शनिवारी (११ ऑक्टोबर २०२५) झाला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
भाजपातील इनकमिंगवर पक्षातील काही मंडळी नाराजी असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर फडणवीस म्हणाले, ‘भाजपात ताकतवादन कार्यकर्ता आला तर त्याला प्रवेश दिला जाईल. कार्यकर्ते त्यांचा स्विकार करतील. काही वेळा नाराजी उद्भवली तर कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढतो. कार्यकर्ते समजून घेतात.’
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काय चर्चा झाली यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मागील निवडणुकीत काय स्थिती होती, आता काय स्थिती आहे याचा आढावा घेतला. युतीच्या संदर्भातील परिस्थिती, अडचणी समजून घेतल्या. पक्षाची संघटना, निवडणूक संघटन यासंबंधी चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मंत्री, आमदार, खासदर, पदाधिकारी, जिप. नगरसेवक उपस्थित होते. एकेका जिल्हयाचा आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत.शक्य असेल तिथं महायुती शक्य नसेल तर स्वतंत्र. पण मित्रपक्षांवर टीका करायची नाही.’
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करु नये, हे आमचं स्ष्पष्ट मत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिक वाद, चिखलफेक मिटली पाहिजे यासाठी प्रयत्न केले आहेत. बाकी राजकीय आरोप, प्रत्यारोप होत असतात.’
मेळाव्याला जिल्ह्यातून खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर,विजय जाधव, अशोक स्वामी, अरुण इंगवले आदी उपस्थित होते.