उष्णतेची तीव्र लाट येऊन मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो : शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी
schedule15 May 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ वातावरणातील बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होईल. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर वाढेल. वातावरणातील बदलामुळे पाण्याची टंचाई, शेती उत्पादनात घट होईल. पायाभूत सुविधांचे नुकसान आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. लाखो लोकांना गरीबी आणि विस्थापनाकडे ढकलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही दिवसात तीव्र उष्णतेची लाट येऊन आगामी मान्सूनमध्ये व्यत्यय येऊ शकतो.’ असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी गडहिंग्लज येथे बोलताना केले.
येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्य आयोजित व्याख्यानात डॉ.कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महेश तुरबतमठ होते. सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ म्हणाले पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास मानवच जबाबदार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे.
याप्रसंगी शास्त्रज्ञ कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पोवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पार्थ सुनील शिंत्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. सुनील देसाई प्रा.जे. बी. केसरकर, प्रा.शिवाजीराव सावेकर , प्रा. शिवाजीराव होडगे, श्रद्धा शिंत्रे, प्रा कल्याणराव पुजारी, डॉ. सीमा साखरे, प्रा.आशालता मगर, प्रा.अनिल मगर, किशोर अदाटे, साताप्पा कांबळे, बाळासाहेब गुरव,यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.