महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिनेमाचं क्षेत्र हे बेभरवशाचं. प्रत्येक सिनेमागणिक येथे यशापयशाचे चित्र बदलत जाणारं. मात्र काही मंडळी व्यवसाय आणि आवड या दोन्हीचा मिलाफ साधत वर्षानुवर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे, कोल्हापूरचे सुरेंद्र पन्हाळकर ! सिनेमा, प्रदर्शन आणि निर्मिती या क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीला यंदा पन्नास वर्षे होत आहेत. १९७४ ते २०२४ ही त्यांची सिनेमाशी निगडीत कारकिर्द आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून ‘चिमण्यांची शाळा’ या सिनेमापासून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. या सिनेमाची निर्मिती पुण्याचे काळे यांनी केली होती. तर दिग्दर्शक अनंत माने होते. नामांकित दिग्दर्शक दत्ता माने हे पन्हाळकर यांचे मामा. दत्ता माने यांनी एकूण १८ सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षी पन्हाळकर यांनी आते भाऊ सुरेश माने यांच्याबरोबर राजाराम चित्रमंदिर येथे दुपारी बारा वाजतचा शो चालवावयास घेतला.
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळून त्यांनी उमा टॉकीज मॅटिनीसाठी घेतला. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी वितरण संस्था केली. सुरेश माने निर्मित ‘हात लावीन तिथं सोनं’ या सिनेमाचे महाराष्ट्रभर वितरण केले. याशिवाय दानवीर कर्ण, दारासिंगचे दोन सिनेमे आणि देव आनंद यांचा माया हा सिनेमा वितरणासाठी घेतला. कोल्हापुरातील प्रसिद्ध निर्माते विष्णूपंत चव्हाण यांचे ‘जय मल्हार, घरधनी जीवाचा सखा, दूध भात, कुलदैवत, शाहीर परशराम, पेडगावचे शहाणे या सिनेमाचे वितरण ही सुरेंद्र पन्हाळकर यांनी मिरजेत केले. निर्माते व मोठे भाऊ रविंद्र पन्हाळकर यांचे ‘सहकार सम्राट, घरंदाज, फुकट चंबू बाबूराव, मंगळसूत्र’ या सिनेमाचे वितरणही केले.
सिनेमाचं वितरण क्षेत्रात काम करत असताना सुरेंद्र पन्हाळकर यांनी निर्मात म्हणून दोन सिनेमे केले. ‘खुर्ची सम्राट व टोपी खाली दडलंय काय’ या सिनेमाच्या निर्मितीसह वितरणाची जबाबदारी पेलली. महाराष्ट्रभर या सिनेमांचे वितरण केले. त्यांची अंबिका चित्र प्रकाशन ही संस्था आहे. सध्या सिनेमा वितरण, प्रदर्शन, निर्मितीमध्ये मोठी स्पर्धा आहे. निर्मिती प्रक्रियेत बदल झाला. तंत्रज्ञानाचा अवलंब वाढला. पण न डगमगता पन्हाळकर हे या क्षेत्रात कार्यरत आहेत. सिने व्यवसायातील पन्नास वर्षाचा कालावधी हा खूप काही शिकवणारा, अनुभव देणारा ठरला आहे. पन्हाळकर म्हणतात, ‘चांगल्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचली पाहिजे ही आपली ईच्छा. पण आता सिनेमाचा बाजार झाला आहे. ५० वर्षे कशी निघून गेली कळाले नाही. यामध्ये फक्त कमावले नाही गमावले सुद्धा. आताची मंडळी फक्त पैशावरच प्रेम करीत आहेत.”