पंचगंगा नदीवर पूल नव्हे धरण, पुलासाठी टाकलेला भराव व रुईचा बंधारा कोल्हापूरच्या पुराचे कारण
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापूरमुक्त करण्यासाठी तत्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात अन्यथा प्रशासनाच्या विरोधात लोकांना सोब घेऊन जन आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांनी दिला. वारंवार पाठपुरावा करुनही जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन यांनी पुरेशा गांभीर्याने महापुराच्या समस्येकडे पाहिले नाही. यासंबंधी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची एक ऑगस्ट रोजी भेट घेणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.मंत्री महोदयांच्या समोर प्रशासनाचा नाकर्तेपणा निदर्शनास आणणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधताना भराव टाकून तयार केलेला कृत्रिम बंधारा व रुई येथील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला टाकलेला दोन किलोमीटर लांबीचा भराव हेच कोल्हापूरच्या पूर परिस्थीतीस कारणीभूत आहेत. दरवर्षी पुरामुळे शेतकरी, नागरिक, व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व पुराची तीव्रता कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भरावा खालून पाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी पाइप टाकावी, या पद्धतीची उपाययोजना करुन आठ ते दहा कोटी रुपये खर्चात होऊ शकते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही हे शक्य आहे. प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनने या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा असेही कदम यांनी सुचविले.
कदम म्हणाले, ‘पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरोली ते सांगली फाटा व गांधीनगर फाटानजीक (कोल्हापूरचे प्रवेशद्वार) ते उचगाव दरम्यान उड्डाणपूल बांधले. या उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी भ्घ्राव टाकण्यात आला. दोन्ही पुलामधील पातळी समान करतेवेळी जुन्या रस्त्यावर आठ ते दहा फुटाचा भराव टाकला. रस्ते चौपदरीकरणाचे हे काम २००३ ते २००५ या कालावधीत झाले. पंचगंगा नदी ते सांगली फाटापर्यंत काम करत असताना भरावा खालून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पंचगंगा नदीवरील पूल हा पूल नसून बांधले आहे असे म्हटले तर वावगे नाही. रुई येथील बंधारा बांधतानाही या बंधाऱ्याला जोडणारे रस्ते करत असतान दोन्ही बाजूला दोन किलोमीटर लांबीचा भराव टाकला. पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था केली नाही. यामुळे पाणी ओसरत नाही. हे कदम यांनी निदर्शनास आणले.
कदम म्हणाले, ‘ पाण्याचा लवकर निचरा होत नसल्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले, निवेदने दिली. उपाययोजनेसंबंधी चर्चा केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूर पूरमुक्त व्हावे यासाठी उपाययोजना आखाव्यात, अन्यथा आंदोलन करण्यावाचून पर्याय नाही,’ पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, वैभव माने, रुपेश आडूळकर, विजेंद्रसिंह माने आदी उपस्थित होते.