महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आता जनतेचा विश्वास राहिला नाही गेल्या दहा वर्षाच्या भाजपच्या कामकाजाला लोक वैतागले आहेत. खोट्या आश्वासनाच्या पलीकडे जनतेच्या आधी काही पडले नाही.त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडी बाजी मारणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल." असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ बुधवारी एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान येथे सभा होत आहे. या निमित्ताने ते कोल्हापुरात आले आहेत. हॉटेल सयाजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, "इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर अग्नीवीर योजना बंद केली जाईल. भाजप सरकारने अग्नीवर योजना सुरू करून तरुणांचे भविष्य धुसर बनविले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये तरुण, शेतकरी, महिला वर्गाच्या उन्नतीसाठी योजना आखल्या आहेत.उद्योग, कृषी अशा विविध घटकासाठी योजना आहेत. दरवर्षी ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील."
भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यांची चारशे पार या घोषणेत काही अर्थ नाही. जनमत बदलत आहे हे मोदी यांच्या लक्षात आल्यामुळे ते काँग्रेस विरोधात वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. मोदी यांची वक्तव्ये ही अतिशय खालच्या पातळीचे आहेत. " असे सांगून रमेश म्हणाले, "इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर एकच पंतप्रधान असेल. दरवर्षी पंतप्रधान बदलण्याचा विषयच नाही. दक्षिणेमधील राज्ये वेगळा देश करत आहेत हा मोदींचा कांगावा आहे. सत्तेसाठी ते काहीही बोलत असतात. खोटे बोलून लोकांत संभ्रमावस्था करायची ही भाजपची पद्धतच आहे."
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, आबा दळवी आदी उपस्थित होते.