सकारात्मक अभिव्यक्तीतून माणूसपण घडते : डॉ. आलोक जत्राटकर
schedule17 Jan 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सकारात्मक अभिव्यक्तीमधून माणूसपण घडत जाते आणि मानवतेच्या कक्षा रुंदावतात’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील अंतर्गत शिक्षकांमध्ये गुणवत्ता व कौशल्यवृद्धीसाठी बातमीलेखन याविषयी डॉ. जत्राटकर यांचे काल (दि. १६) विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. कृष्णा पाटील अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाला, कौशल्याधारित ज्ञानाला विशेष महत्व असल्याने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत व्याख्यान आयोजित केले होते. डॉ.जत्राटकर म्हणाले, अभिव्यक्ती ही मानव असण्याची पूर्वअट आहे. त्यासाठी भोवतालामधून प्रेरणा घेऊन आपल्या वाचन, लेखन आदी अभिव्यक्तीच्या दिशा शोधाव्या लागतात. अनुभव आणि सातत्य यामधून ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. बातमी लेखन ही एक शैलीदार कला असून हे कौशल्य प्रत्येकाला सरावातून विकसित करता येते. असे सांगितले. यावेळी डॉ.नितीन रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन भोसले यांनी परिचय करून दिला. संदीप थिटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नगीना माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपकुलसचिव विनय शिंदे, समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर उपस्थित होते.