महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावर बोलताना गोकुळचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी, " केवळ दोनच वर्षाचे कशासाठी, गोकुळचे मागील पंचवीस वर्षाचे लेखापरीक्षण करा" अशी मागणी केली आहे.
गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणावरून कोल्हापुरात महाडिक आणि पाटील गटातील संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. गोकुळमध्ये २०२१ मध्ये सत्ता परिवर्तन झाले. माजी आमदार महादेवरा् महाडिक यांची सत्ता संपुष्टात आली. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूक जिंकली. महाडिक गटाकडून शौमिका महाडिक या निवडून आले आहेत. महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराच्या विरोधात सहकार खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. सत्ताधारी व प्रशासनाकडून गोकुळच्या कामकाजाबद्दल माहिती दिली जात नाही, गोकुळचे लेखापरीक्षण अयोग्य पद्धतीने झाले आहे. पुन्हा शासकीय चाचणी लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती. दोनच दिवसापूर्वी गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचा आदेश निघाला आहे. दहा दिवसात चाचणी लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना आहेत.
महाडिकांची तक्रार, गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण यासंबंधी पत्रकाराने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना प्रश्न विचारले असता, "गोकुळचे दोनच वर्षाचे लेखा परीक्षण कशासाठी, मागील पंचवीस वर्षाचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी करत आहे." असे त्यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी मागील २५ वर्षाच्या कारभाराचे लेखापरीक्षणाची मागणी करत महाडिक गटाला डिवचले. कारण गोकुळमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दीर्घकाळ सत्ता केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, "आम्ही सत्तेमध्ये असताना कधीही सुडाचे राजकारण केले नाही. महाविकास आघाडीच्या कालावधीत काँग्रेसकडेच विकास मंत्री पद होते. मी ठरवले असते तर तेव्हाच गोकुळ आणि राजाराम कारखान्यावर प्रशाक नेमला असता. मात्र आम्ही सुडाचे राजकारण करत नाही." अशा शब्दात पाटील यांनी महाडिक यांना टोला लगावला.