जयश्री दानवे लिखित'अभिनयांकित' पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : 'नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कलेचा समृद्ध वारसा जयश्री आणि राजदर्शन या भावंडांनी जपला असून पुढच्या पिढीसाठी अशा कलाकारांची पुस्तके यायला हवीत. कलेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीने जपायला हवा’असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
मराठी सिनेनाट्यसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक अन खलनायक म्हणून गाजलेले नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे लिखित 'अभिनयांकित' पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. याप्रसंगी ते बोलत होते. साहित्यिक डॉ. जी. पी. माळी, कमला कॉलेजचे
मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुजय पाटील उपस्थित होते.
डॉ. जी.पी.माळी म्हणाले, 'कलाकार हे समाजाचे एक घटक असतात म्हणूनच ते सामाजिक बांधिलकीही जपतात हे या पुस्तकातील १६ अभिनेत्यांचा प्रवास पाहिला की समजते. डॉ.सुजय पाटील म्हणाले, 'आपण आज जे कलाकार,
दिग्दर्शक पाहतो ते नटश्रेष्ठ दानवेंच्या तालमीत तयार झाले आहेत म्हणून अशा नटश्रेष्ठाचे स्मरण आणि अशा कलाकारांच्या पुस्तकाचीही गरज आहे.’
जयश्री दानवे म्हणाल्या,'डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, जयशंकर दानवे तसेच कलायात्री दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे,
सचिन खेडेकर यांचा जीवनप्रवास व कलाकर्तृत्वाचा आढावा 'अभिनयांकित' पुस्तकात मी घेतला आहे.
राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. यावेळी सुधीर पेटकर, डॉ. अजित भागवत, पी.जी.मेढे, प्रा. प्रभाकर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, माजी नगरसेविका माणिक पाटील उपस्थित होते.