महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
गळा आवळून पत्नीच खून केल्याचा संशय व्यक्त केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यात अश्विनी एकनाथ पाटील (वय २८, रा. दोनवडे, ता. करवीर) या महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती एकनाथ कृष्णा पाटील (रा. दोनवडे) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू माने (वय ४२, रा. केर्ले, ता. करवीर) या महिलेच्या चुलत्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. अश्विनी हिला दोन मुली असून मुलगा होत नसल्याने पती एकनाथ तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्याच्या वागण्याने अश्विनीच्या माहेरच्या नातलगांनी एक बैठक घेऊन एकनाथला समजावलेही होते. आज शनिवारी सकाळी पाण्याचा मोटारचा शॉक लागून अश्विनीचा मृत्यू झाला आहे, असा निरोप एकनाथने अश्विनीच्या नातलगांना दिला. नातलग सीपीआर हॉस्पिटलमध्ये आल्यावर एकनाथने अश्विनीचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाला असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकानी खोदून विचारले असता अश्विनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले. सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत पाटील यांनी मृतदेहाची तपासणी केली असता गळ्याला पांढरा स्कार्फ बांधल्याचे लक्षात आले. त्यांनी स्कार्फ काढला असता गळावर गळफास लावल्याचे काळे व्रण दिसले. त्यानंतर अश्विनीचे चुलत सासरे प्रकाश माने यांनी एकनाथ पाटील याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर एकनाथ पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.