महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शुक्रवार पेठ जैन गल्ली येथील एका महिलेचा मृतदेह बालिंगा ते शिरोली दुमाला या रस्त्यावरील पाडळी खुर्द या गावातील शेतात सापडला. आरती आनंद सामंत (वय 45 ,रा. जैनमठ गल्ली शुक्रवार पेठ) असे हे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पाडळी खुर्द (तालुका करवीर) येथील बिगा नावाच्या शेतात मृतदेह सापडला. घातपाताचा प्रकार असावा असा पोलिसांना संशय आहे. करवीर पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात हलविला आहे.
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील राजवर्धन पाटील यांच्या मालकीच्या शेतात मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर 45 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना आज शुक्रवारी सकाळी आढळून आला.पोलीस पाटीलांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या आयडीकार्डमुळे मृतदेहाची ओळख पटली असून आरती अनंत सामंत असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. तसेच हाताला खरचटले आहे. अंगावरील दागिने लंपास केलेला संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
आरती सामंत या मूळच्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी या गावच्या असून त्या सध्या शुक्रवार पेठ जैन गल्लीत राहत होत्या. त्यांना दोन मुली असून एक विवाहित मुलगी असून दुसरी मुलगी पुण्यात शिक्षण घेत आहे.