महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये गेली काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अपुरा पाणीपुरवठामुळे नागरिकांची हाल होत असून या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (३१ मार्च) कोल्हापूर महापालिकेवर धडक आंदोलन करण्यात आले. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंबंधी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारला. जवळपास अर्धा तास प्रवेशद्वार रोखून धरला.
कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये गेले काही दिवस अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. प्रशासनाच्या या चालढकल प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना कोल्हापूर शाखेतर्फे शुक्रवारी दुपारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले या आंदोलनात महिलांनी रिकाम्या घागरी डोक्यावर घेत शहरातील अपुऱ्या पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अपुरा पाणीपुरवठा वरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शहराला अपुरा पाणी प्रोडक्ट करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा अधिकार असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
आंदोलनात माजी नगरसेवक नियाज खान, दत्ता टिपुगडे प्रतिज्ञा उत्तुरे, महिला आघाडीच्या स्मिता सावंत- मांढरे, प्रीती क्षीरसागर, दिपाली शिंदे, पूनम फडतारे, रिक्षा सेनेचे राजू जाधव, विशाल देवकुळे , शशी बिडकर, सुशिल भादिंगरे, विजय सावंत आदींचा सहभाग होता.
महापालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, "कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा ही आमची मागणी आहे. शहरवासियांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ नयेत. शहरातील विविध भागांमध्ये पूर्ण दाबाने पाणीपुरवठा झाला पाहिजे. यासंबंधी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापालिकेचा चुकीचा कारभार सहन केला जाणार नाही. पाणीपुरवठाच्या विभागाच्या कामकाजात सुरळीतपणा आला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर शिवसेना महिला आघाडीतर्फे अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल"