महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुरातत्व विभाग व सरकारची कोणतीही परवानगी न घेता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीवर १८ सप्टेंबर रोजी संवर्धन प्रक्रिया राबवली. मूर्ती कोणामुळे दुखावली आणि परवानगी न घेता करण्यात आलेल्या मूर्ती संवर्धन कामाची न्यायालयीन चौकशी करावी यासाठी कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे देवस्थान समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
याविषयी दोषींवर कारवाई झाली पाहिजे यासाठी हायकोर्टात दाद मागणार असल्याचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व शहरप्रमुख इंगवले यांनी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शिवसेनेतर्फे निवृत्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासून देवस्थान समितीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. वाजतगाजत हा मोर्चा निघाला. ‘मूर्ती संवर्धन प्रक्रियेत राज्यातील एका मंत्र्यांनी दबाव टाकला’असा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मूर्ती संवर्धन प्रक्रियेसाठी पुरातत्व खात्याची परवानगी घेतली होती का ? प्रशासनाने मान्यता दिली होती का ? कोणाच्या आदेशाने ही प्रक्रिया राबवली ? मूर्ती संवर्धन प्रक्रियेविषयी जाहीर प्रकटन का केले नाही ? अशी प्रश्ने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी उपस्थित केला.
सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे अर्जही पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
देवस्थान समितीचे सचिव नाईकवाडे यांनी,जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रक्रियेचे काम झाले आहे. प्रक्रियेचे काम करण्यापूर्वी मंदिराच्या चारही प्रवेशद्वारासमोर त्यासंबंधीची प्रसिद्धी केली होती. त्या आशयाची नोटीस प्रवेशद्वाराबाहेर प्रसिद्ध केले होते.असे सांगितले.
आंदोलनात शहरप्रमुख सुनील मोदी, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, दत्ताजी टिपुगडे, राजू जाधव, दीपक गौड,धनाजी दळवी, अनिल पाटील, विजय देसाई, रणजित कोंडेकर, राजू यादव, कमलाकर जगदाळे, मंजित माने, सागर साळोखे, दिनेश साळोखे, स्वरूप मांगले, किरण पडवळ, वैभव जाधव, अवधेश करंबे, अभिजीत बुकशेठ, दिपाली शिंदे, श्वेता चितारे, सिद्धी परब, अतुल साळोखे, गोविंद वाघमारे, श्रीकांत सोनवणे, केदार वाघापूरकर, प्रशांत नाळे, जालिंदर माने, संजय जाधव आदींचा समावेश होता.