महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठीचे प्रकल्प नियमित राबवून प्रदूषण नियंत्रणासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ज्या त्या विभागांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, जेणेकरुन या अहवालातील बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन पंचगंगेचे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात यश येईल.”असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैसवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के, विभागीय आयुक्त सौरभ राव प्रादेशिक अधिकारी जे एच साळुंखे, एमआयडीसीचे विशेष कार्य अधिकारी एस. बी. पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.
प्रधान सचिव जैसवाल म्हणाले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, इचलकरंजी महानगरपालिका व संबंधित यंत्रणांनी नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांचा अभ्यास करुन विभागीय आयुक्तांमार्फत सविस्तर अहवाल सरकारला सादर करावा. घरगुती सांडपाण्यावर सनियंत्रण प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आराखडा स्थानिक स्वराज्य संस्थांनी सादर करावा.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार घटक व उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपाययोजनेसंबंधी माहिती दिली. याप्रसंगी क्षीरसागर यांनी, ‘प्रभावी भावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, राज्य सरकारच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया,’असे सागितले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, कार्यकारी अभियंता अतुल डोरे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आदी उपस्थित होते.