महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खाजगी क्षेत्र व अशासकीय संस्थाच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना राज्य सरकारने केली आहे. "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष" पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत "विकसित भारत- भारत@२०४७(India@2047)" करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महाराष्ट्र राजाची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.
दरम्यान "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी निर्णयानुसार "मित्र" संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात "उपाध्यक्ष"पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.